प्रतिनिधी/ बेळगाव
तामिळी महाकवी सुब्रमण्यम भारती या श्रेष्ठ साहित्यकाराचा जन्मदिवस ‘भारतीय भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. हिंदी प्रचार सभेतर्फे भारत सरकारने जाहीर केलेला भारतीय भाषा दिवस खडेबाजार, बेळगाव येथे नुकताच साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष रतन पाटणकर होते.
प्रारंभी वैष्णवी डोंगरे हिने ईशस्तवन सादर केले. सचिव प्रा. पी. डी. साटम यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय बी. बी. शिंदे यांनी करून दिला. प्रमुख पाहुणे निवृत्त प्राचार्य डॉ. के. वाय. सत्तीगिरी यांनी भाषा ही माणसे जोडण्याचे उत्तम माध्यम असून अनेक भारतीय भाषांचे महत्त्व समजावून घेण्यात मोठा आनंद आहे. अनेक फुलांच्या रंगाने एखादा हार कसा आकर्षक दिसतो. त्याप्रमाणे अनेक भाषा येण्याने व्यक्तिमत्त्व खुलते, असे सांगितले.
प्रमुख वक्ते हिंदी भाषा केंद्रीय अधिकारी डॉ. जयशंकर यादव यांनी, नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षणापासून सर्व भारतीय मातृभाषांना महत्त्व दिले आहे. भारतीय भाषांचा इतिहास, त्यांची प्रगती, त्यातील वैशिष्ट्यापूर्ण शब्द, त्यांचे सौंदर्य, साहित्यिक मूल्ये यांचे उत्तम विवेचन केले. आज आयआयटी व एमबीए परीक्षांचे माध्यम मातृभाषेतून होत आहे. भारतीय भाषा दिवस या निमित्ताने 12 जानेवारी राजघाट येथे सर्व भाषिक साहित्यकारांचे संमेलन आयोजित केले आहे, असे सांगितले.
यावेळी अशोक मुन्नोळी, आर. एस. बाळीगा, हिंदीप्रेमी सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डी. एस. मुतकेकर, यल्लुप्पा काकतकर आणि एल. वाय. कावळे यांनी केले. प्रा. पी. डी. साटम यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.