संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक संमत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दक्षिण ध्रुवावरील भारताच्या अधिपत्यातील संशोधन स्थानकांच्या परिसरात भारतीय कायदे लागू करण्यास संसदेने अनुमती दिली आहे. यासंबंधीचे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत सोमवारी संमत करण्यात आले. हे विधेयक भारतीय दक्षिण ध्रूवीय विधेयक या नावाने ओळखले गेले आहे.
हे विधेयक राज्यसभेत वसुंधरा शास्त्र (अर्थ सायन्सेस) मंत्री जितेंद्र सिंग यांनी मांडले होते. अल्पकालीन चर्चेनंतर ते ध्वनिमताने संमत करण्यात आले. चर्चा सुरु असताना विरोधी पक्षांच्या काही सदस्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ईडीने शिवसेनेच्या उद्धव गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या केलेल्या अटकेचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभाध्यक्षपदी असणारे भुवनेश्वर कलिता यांनी तो मान्य केला नाही. तसेच त्यांनी दक्षिण ध्रूव विधेयकावर मतांची विभागणी करण्याचा निर्णय दिला. तथापि, त्याचवेळी विरोधी पक्षाचे अनेक खासदार सभाध्यक्षांच्या आसानाजवळ येऊन घोषणाबाजी करु लागल्याने मतविभागणी अशक्य बनली. त्यामुळे अखेर पर्यायी सभाध्यक्षांनी ध्वनिमत घेण्याचा आदेश दिला. ध्वनिमताने विधेयक संमत झाल्याचे त्यांनी घोषित केले.
लोकसभेतही हे विधेयक त्वरित संमत करण्यात आले. या विधेयकामुळे दक्षिण ध्रुव प्रदेशात भारताला अधिक संशोधन करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. भारताने या क्षेत्रात आपले अस्तित्व अधिक बळकट करण्याची आवश्यकता असून त्यासाठी हे विधेयक आवश्यक आहे, असे प्रतिपादन सत्ताधारी सदस्यांनी केले. अशा प्रकारे संसदेने या विधेयकाला संमती दिली आहे.
काँगेसच्या चार खासदारांचे निलंबन मागे
सभागृहात शिस्तभंग केल्याच्या कारणास्तव निलंबित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे. सोमवारी त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर हा निर्णय घोषित केला. मणिकम टागोर, रम्या हरिदास, टी. एन. प्रथापन आणि एस. ज्योथीमती अशी या खासदारांची नावे आहेत.
या खासदारांना सभागृहात फलक फडकविल्याच्या कारणास्तव आठवडा संपेपर्यंत निलंबित करण्यात आले होते. आता आठवडा संपल्याने हे निलंबन मागे घेण्यात आले. मात्र, सभागृहाचे नियम पाळण्याचे वचन त्यांच्याकडून घेण्यात आले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरु झाले आहे. मात्र, आतापर्यंत अत्यल्प कामकाज झाले आहे. अनेक मुद्दय़ांवरुन समागृहात गोंधळ माजविला गेल्याने कामकाज होऊ शकलेले नाही. सभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी यासंबंधी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. अखेरचा उपाय म्हणून निलंबन झाले होते.