जहाजावरून हवेत मारा करणाऱया क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी यशस्वी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय नौदलाने गुरुवारी जहाजावर आधारित पृ÷भागावरून हवेत मारा करणाऱया क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. कमी उड्डाण करणारे लक्ष्य गाठण्यात आले असले तरी नौदलाच्या मोहिमेतील हे मोठ यश असल्याचे सांगण्यात आले. या यशस्वी चाचणीचा व्हिडीओ भारतीय नौदलाने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. पश्चिम किनारपट्टीवर तैनात असलेल्या स्टेल्थ फ्रिगेटवरून नौदलाने क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्यानंतर भारतीय नौदलाने ट्विट करत आपल्या टीमच्या ‘फर्स्ट हिट, फर्स्ट हार्ड’ या मंत्राला दुजोरा देत यशस्वी चाचणीची माहिती दिली. यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नौदलाचे विशेष अभिनंदन केले आहे.
भारताने गेल्या आठवडय़ात स्वदेशी नौदल अँटि-शिप क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओडिशातील चांदीपूर येथे एकात्मिक चाचणी श्रेणीतून (आयटीआर) नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून हे प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांनी संयुक्तपणे ही चाचणी केली. भारतीय नौदलाने विकसित केलेली ही पहिली हवाई प्रक्षेपित अँटि-शिप क्षेपणास्त्र प्रणाली आहे. या चाचणीत क्षेपणास्त्राने पूर्वनियोजित लक्ष्य यशस्वीपणे टिपले होते. क्षेपणास्त्र प्रक्षेपणासाठी हेलिकॉप्टरमध्ये स्वदेशी विकसित लाँचरसह अनेक नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणालीमध्ये अत्याधुनिक प्रक्षेपण आणि एकात्मिक हवाई यंत्रणेचा समावेश आहे.
भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने केलेल्या यशस्वी चाचण्यांमुळे संरक्षण यंत्रणेला नवे बळ मिळाले आहे. या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे नौदलाची ताकद वाढली आहे. लष्करी शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वावलंबी होण्याच्या दिशेने ही चाचणी पहिली पायरी मानली जात आहे.
स्वावलंबनाच्या दिशेने वेगाने वाटचाल
देशात स्वदेशी क्षेपणास्त्र निर्मितीला सरकारकडून चालना दिली जात आहे. त्याअंतर्गत अँटि-शिप क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या सरकारकडून संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होणे आणि देशात बनवलेल्या लष्करी शस्त्रांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे, या उद्देशाने आयातीवर निर्बंध लादले जात आहेत. याचदरम्यान भारतीय नौदल स्वावलंबी होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 17 मे रोजी मुंबईतील माजगाव डॉक येथे स्वदेशी बनावटीच्या ‘सुरत’ आणि ‘उदयगिरी’ या दोन युद्धनौकांचे जलावतरण केले. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कोविड आणि युपेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान या युद्धनौकांची निर्मिती आणि प्रक्षेपण हे देशाची सागरी क्षमता आणि आत्मनिर्भरतेचे उदाहरण असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले होते.