वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील हेंगझोयु येथे 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी शनिवारी अखिल भारतीय रायफल संघटनेने 33 सदस्यांचा भारतीय नेमबाज संघाची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे द. कोरियातील चेंगवान येथे 22 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई नेमबाजी चॅम्पियन स्पर्धेसाठी 35 सदस्यांचा भारतीय नेमबाज संघ घोषित करण्यात आला आहे.
चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी नेमबाजीमधील 16 प्रकारात भारतीय नेमबाज सहभागी होणार आहेत. यामध्ये 4 मिश्र सांघिक प्रकारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी रुद्रांक्ष पाटील, मेहुली घोष, सिप्ट कौर समरा आणि राजेश्वरी कुमारी हे सहभागी होत आहेत. या चारही भारतीय नेमबाजांनी यापूर्वीच पॅरीस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे. मनू भाकर, दिव्यनेश सिंग, पनवार, एwश्वर्य प्रतापसिंग तोमर, अकिल, शेरॉन, रिदम सांगवान, इशा सिंग, आदर्श सिंग, के. चेनाई, गनेमत सेखॉ यांना ही आगामी आशियाई स्पर्धा पॅरीस ऑलिम्पिकसाठी संधी राहिल. भारताच्या सात नेमबाजांनी आतापर्यंत पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. त्यात बी. मेंडीरेटा, रुद्रांक्ष पाटील, स्वप्नील कुसाळे यांचा समावेश आहे.