वृत्तसंस्था/ ताश्कंद
यजमान उझबेकिस्तानने येथील पख्तकोर स्टेडियमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रिपूर्ण फुटबॉल सामन्यात अतिरिक्त वेळेत गोल करत भारतीय महिला संघाचा 3-2 असा पराभव केला. थॉमस डेनरबीच्या खेळाडूंनी जबरदस्त लढत देऊन सामना 2-2 असा बरोबरीत सोडवत आणला होता. परंतु अतिरिक्त वेळेच्या दुसऱयाच मिनिटाला कामिला झारीपोव्हाने गोल करून त्यांच्या आशा धुळीस मिळविल्या.
सामना सुरू झाल्यानंतर लगेचच सहाव्या मिनिटाला अंजू तमांगने आघाडी मिळवून देण्याच्या जवळ पोहोचताना उझबेकिस्तानच्या बचावपटूला चकविण्याबरोबर डाव्या पायाने फटका हाणून गोलरक्षकालाही चकविले होते. मात्र, चेंडू जाळय़ात जाण्याइतका फिरला नाही. यजमानांनी पुढच्याच मिनिटात ल्युडमिला कराचीकच्या नेतृत्वाखाली प्रतिहल्ला करताना गोलसमोर असलेल्या डायोरा खाबीबुल्लाएवाला हिला क्रॉस पास दिला आणि तिने चोखरीत्या आपली जबाबदारी पार पाडत संघला आघाडी मिळवून दिली.
मात्र, भारत त्यामुळे दबला नाही. 22 व्या मिनिटाला डांगमेई ग्रेसने उजव्या बाजूने फटका हाणून 1-1 अशी बरोबरी साधून दिली. पण कर्णधार आशालता देवीने पेनल्टी बॉक्सच्या आत चेंडू हाताळून एक महागडी चूक केल्याने भारताचा आनंद अल्पकाळ टिकला आणि कराचीकने 2-1 अशी आघाडी उझबेकिस्तानला मिळवून दिली. दुसऱया सत्राच्या सुरुवातीला उझ्बेक संघ 3-1 अशी आघाडी मिळवू शकला असता. पण 59व्या मिनिटाला डायोराने हाणलेला फटका भारताची गोलरक्षक श्रेया हुडा आणि रितू राणी यांनी निष्फळ ठरविला. दोन मिनिटांनंतर इंदुमती कथिरेसनने गोल करून 2-2 अशी बरोबरी भारताला साधून दिली. त्यानंतर हा सामना बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच यजमनांचे पारडे भारी ठरले.