वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल
भारत आणि यजमान इंग्लंड महिला क्रिकेट संघातील दुसरा टी-20 सामना येथे आज मंगळवारी खेळविला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी साफ कोलमडल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 11 वाजता प्रारंभ होईल.
या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय महिला संघातील फलंदाजांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. कर्णधार हरमनप्रित कौर, स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज या फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर अधिक जलद धावा जमविण्यासाठी आपल्या डावपेचात बदल करावे लागतील. क्रिकेटच्या या अतिजलद प्रकारामध्ये पहिल्या दहा षटकानंतर भारतीय फलंदाजांना धावांची गती वाढवता आलेली नाही. कर्णधार कौर फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी अद्याप झगडत आहे. भारतीय संघातील राधा यादव ही अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरी झालेली नाही. मंगळवारच्या सामन्यापूर्वी तिला आपली तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागेल.
संघ- भारत- हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका सिंग, मेघना सिंग, राधा यादव, एस. मेघना, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, डी. हेमलता, सिमरन दिलबहादूर, रिचा घोष आणि किरण प्रभू.
इंग्लंड- ऍमी जोन्स (कर्णधार), लॉरेन बेल, माईया बुचर, ऍलिसी कॅप्से, केटी क्रॉस, फ्रेया डेव्हिस, सोफिया डंकले, सोफी इक्लेस्टोन, सारा ग्लेन, फ्रेया केम, ब्रियोनी स्मिथ, इसे वाँग आणि डॅनी वॅट.