हरमनप्रीतकडे नेतृत्व
संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मजबूत 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व करेल. 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताने त्यांच्या संघाची घोषणा केली आहे.
भारत 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल, तर 6 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत होईल. मागील स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या भारताला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासह स्पर्धेच्या ‘अ’ गटात ठेवले आहे.
हरमनप्रीतला उपकर्णधार स्मृती मानधना साहाय्य करणार असून ती शफाली वर्मासह सलामीला येईल अशी अपेक्षा आहे. दयालन हेमलताच्या रुपाने संघात आणखी एक ‘टॉप ऑर्डर’ पर्याय आहे. त्यांच्याव्यतिरिक्त जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांच्या समावेशामुळे भारतीय संघाच्या फलंदाजीला बळकटी आलेली आहे. यास्तिका भाटियासह रिचा ही संघातील यष्टिरक्षक आहे.
रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार, दीप्ती शर्मा, राधा यादव, आशा शोभना, सजना सजीवन व श्रेयंका पाटील हे गोलंदाजीत उपलब्ध पर्याय आहेत. भारताकडे हरमनप्रीत, सजना, शोभना आणि दीप्ती यांच्या रूपाने अष्टपैलू खेळाडूंचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. यास्तिका आणि श्रेयंकाची निवड तंदुरुस्तीवर अवलंबून राहील. कारण दोन्ही खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून दुखापतींशी झुंज देत आहेत. भारताने तीन प्रवासी राखीव खेळाडूही घेतलेले आहेत.
गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्या घरच्या मैदानावर 19 धावांनी पराभव करत सहावे विजेतेपद पटकावले होते. भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांना ऑस्ट्रेलियाकडून 5 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.
संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्रकार, अऊंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन.
प्रवासी राखीव : उमा चेत्री, तनुजा कंवर, सायमा ठाकुर.
बिगरप्रवासी राखीव : राघवी बिश्त, प्रिया मिश्रा.