प्रतिस्पर्धी युएईला 104 धावांनी नमवले, जेमिमा रॉड्रिग्यूज-दीप्ती शर्माची शतकी भागीदारी
सिल्हेत-बांगलादेश / वृत्तसंस्था
जेमिमा रॉड्रिग्जने 45 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी साकारल्यानंतर भारतीय संघाने महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेच्या साखळी फेरीत नवख्या संयुक्त अरब अमिरात संघाचा 104 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवला. भारताने 20 षटकात 5 बाद 178 धावांचा डोंगर रचल्यानंतर युएईला 20 षटकात 4 बाद 74 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले.
जेमिमा रॉड्रिग्ज व दीप्ती शर्मा (49 चेंडूत 64) यांनी चौथ्या गडय़ासाठी 13.3 षटकात 128 धावांची भागीदारी साकारली. मात्र, त्यापूर्वी युएईच्या नवख्या गोलंदाजांनी पाचव्या षटकात भारताला 3 बाद 20 अशा अडचणीत आणणे आश्चर्याचे ठरले. केवळ रॉड्रिग्ज व दीप्तीच्या शतकी भागीदारीमुळे भारतीय महिला संघाला सुस्थिती प्राप्त झाली. भारताने अंतिमतः 20 षटकात 5 बाद 178 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
15 सदस्यीय संघातील 11 सदस्य भारतीय वंशाचे असलेल्या युएई संघाला प्रत्युत्तरात 20 षटकात 4 बाद 74 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताचा हा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय असून बांगलादेश व पाकिस्तान संघाविरुद्ध सामने अद्याप बाकी असले तरी भारतीय संघ उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याच्या मार्गावर आहे.
स्मृती मानधना, मेघना व खराब फॉर्ममधील शफाली वर्मा अतिशय स्वस्तात बाद झाल्यानंतर जेमिमा व दीप्ती यांनी 12 व्या षटकापर्यंत डाव सावरण्यावर भर दिला तर नंतर जोरदार आक्रमण सुरु केले. जेमिमाने 11 चौकार तर दीप्तीने 5 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली. दीप्तीचा स्लॉग-स्वेप्टचा 45 डिग्रीतील एक षटकार अतिशय लक्षवेधी ठरला. जेमिमाने स्क्वेअरलेग ते डीप मिडविकेट आणि कव्हर ते एक्स्ट्रा कव्हर या दोन झोनमध्ये सर्वाधिक धावा झोडपल्या.
युएई कर्णधाराने या सामन्यात तब्बल 8 गोलंदाज आजमावले. पण, यानंतरही युएईची डेथ ओव्हर्समध्ये बरीच धुलाई झाली. यातील शेवटच्या 6 षटकात त्यांना 72 धावा मोजाव्या लागल्या.
युएईचा फलंदाजीत सावध पवित्रा
विजयासाठी 179 धावांचे आव्हान असताना युएईला आक्रमणावर भर देणे क्रमप्राप्त होते. मात्र, त्यांचीही खराब सुरुवात झाली. पहिल्या दोन षटकातच युएईची 3 बाद 5 अशी दैना उडाली आणि त्यांना नंतर यातून अजिबात सावरता आले नाही. विजयापासून दूर रहावे लागले असले तरी कविशा इगोदागे (54 चेंडूत नाबाद 30) व खुशी शर्मा (50 चेंडूत 29) यांनी 59 धावांची भागीदारी साकारल्याने युएईला संघ पूर्ण गारद होण्याची नामुष्की टाळता आली.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ ः 20 षटकात 5 बाद 178 (जेमिमा रॉड्रिग्ज 45 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 75, दीप्ती शर्मा 49 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 64, पूजा वस्त्रकार 13. अवांतर 4. सुरक्षा कोट्टे 1-14, छाया मुघल, माहिका गौर, इशा ओझा प्रत्येकी 1 बळी).
संयुक्त अरब अमिरात ः 20 षटकात 4 बाद 74 (कविशा इगोदागे नाबाद 30, खुशी शर्मा 50 चेंडूत 29. अवांतर 4. राजेश्वरी गायकवाड 3 षटकात 2-20, दयालन हेमलता 3 षटकात 1-8).
ब्लर्ब
भारताची पुढील लढत शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध होईल.
कोट्स
जेमिमा व दीप्ती यांनी शतकी भागीदारी साकारल्याने आम्हाला या सामन्यात विजय मिळवता आला. युएईने केवळ 74 धावा केल्या असल्या तरी उत्तम फलंदाजी केली. आम्ही त्यांचा डाव गुंडाळू शकलो नाही, याचे श्रेय त्यांच्या चिवट फलंदाजीला द्यावे लागेल.
-भारताची हंगामी कर्णधार स्मृती मानधना