पहिल्यांदाच इंडोनेशियाच्या बंदरावर भारतीय पाणबुडी
वृत्तसंस्था/ जकार्ता
दक्षिण चीन समुद्रावरून चीनचा अनेक आसियान देशांसोबत वाद सुरू आहे. याचदरम्यान भारताने एक मोठे पाऊल उचलत पहिल्यांदाच स्वतःची पाणबुडी इंडोनेशियात पाठविली आहे. भारतीय पाणबुडी आयएनएस सिंधुकेसरी आसियान देशांमध्ये कूटनीतिक आणि सैन्यसंपर्क वाढविण्याच्या उद्देशाच्या अंतर्गत इंडोनेशियाच्या जकार्ता येथे पोहोचली आहे. 3 हजार टन वजनी आयएनएस सिंधुकेसरी बुधवारी सुंदा उपसागराच्या मार्गे जकार्ता येथे दाखल झाली आहे.
भारत आणि इंडानेशियाचे संबंध मजबूत करण्यासाठी इंडोनेशियन नौदल भारतीय पाणबुडी आयएनएस आयएनएस सिंधुकेसरीचे जकार्तामध्ये स्वागत करत आहोत असे ट्विट करत म्हटले गेले आहे. प्रथमच इतक्या अंतरावर पाणबुडी तैनात करण्यात आल्याचे समजते. यामुळे भारतीय नौदलाची समुद्रात युद्ध लढण्याची क्षमता निदर्शनास येते.
दक्षिण चीन समुद्राच्या मोठय़ा हिस्स्यावर चीन स्वतःचा दावा करत असल्याने इंडोनेशियात भारतीय पाणबुडी तैनात करण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. चीनचा आसियान देश इंडोनेशिया, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेईसोबत वाद सुरू आहे. हे देश देखील दक्षिण चीन समुद्राच्या काही हिस्स्यांवर स्वतःचा दावा करतात. याचमुळे दक्षिण चीन समुद्रावरून तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे चीनने एकतर्फी कारवाई करत अनेक कृत्रिम बेटांची निर्मिती करत तेथे स्वतःच्या नौदलाला तैनात केले आहे.
मागील आठवडय़ात फिलिपाईन्सच्या नौसैनिकांनी ब्राह्मोसच्या युद्धनौकाविरोधी सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. 23 जानेवारीपासून 11 फेब्रुवारीपर्यंत चाललेल्या या प्रशिक्षणात फिलिपाईन्सच्या नौसैनिकांना ब्राह्मोससंबंधी माहिती देण्यात आली. भारताने फिलिपाईन्सला ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यात केली आहे. तर काही दिवसांपूर्वी भारताने सिंगापूरच्या नौदलासोबत अग्नि वॉरियर नावाने युद्धाभ्यास केला होता. तसेच मलेशिया आणि इंडोनेशियासोबतही भारताचा युद्धाभ्यास पार पडला आहे. यातून भारत आसियान देशांची मदत करत असल्याचे स्पष्ट होते. तसेच चीनविरोधी धोरणाचा हा हिस्सा आहे. भारत आणि इंडोनेशियाचे नौदल संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय सागरीक्षेत्रात गस्त घालत असतात.