121 देशांमध्ये आपला क्रमांक 107 वा
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय भूक निर्देशांकाच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक घसरला आहे. आता भारत 121 देशांमध्ये 107 व्या स्थानी आहे. श्रीलंका, नेपाळ, बांगला देश आणि पाकिस्तान हे भारताचे चार शेजारी देशही भारतापेक्षा वरच्या क्रमांकावर आहेत. अफगाणिस्तानचा अपवाद वगळता भारत दक्षिण आशियातील सर्व देशांमध्ये पिछाडीवर असल्याचे शनिवारी घोषित झालेल्या नव्या क्रमवारीत दिसून येत आहे.
जागतिक भूक निर्देशांक हे एखाद्या देशातील नागरीकांना किती अन्न मिळते हे ओळखण्याचे एक साधन आहे. हा निर्देशांक चार महत्वाच्या निकषांवर ठरविला जातो. कुपोषण, बालमृत्यू, बालश्रमिकांचे प्रमाण आणि बालकांची वाढ खुंटण्याचे प्रमाण असे हे चार निकष आहेत. या निकषांवर प्रत्येक देश 100 पैकी जितके गुण मिळवतो त्यावर त्याचा निर्देशांक ठरतो. यात शून्य हा सर्वोत्तम निर्देशांक मानला जातो आणि 100 हा सर्वात वाईट निर्देशांक मानला जातो.
भारताचा यंदाचा निदेशांक 29.1 आहे जो गंभीर मानला गेला आहे. बालकांची वाढ खुंटण्याच्या प्रमाणातही भारताची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. या निकषात भारताने केवळ 19.3 गुण प्राप्त केले आहेत. भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याचा परिणामही या निर्देशांकावर झाला आहे. हे सर्वेक्षण प्रत्येक वर्षी केले जात असले तरी निर्देशांक मात्र सात वर्षांनी एकदा घोषित केला जातो. 2022 मध्ये सर्वच देशांच्या भूक निर्देशांकावर परिणाम झालेला आहे. याचे कारण गेली दोन वर्षे होत राहिलेला कोरोनाचा उद्रेक हे आहे. याशिवाय हवामानातील बदल, युद्धे इत्यादी कारणेही यासाठी आहेत.
44 देशांची स्थिती गंभीर
सर्वेक्षण संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 44 देशांची भुकेसंबंधीची स्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत मोठे परिवर्तन त्वरीत झाले नाही, तर 2030 पर्यंत या देशांची स्थिती अशीच राहू शकते किंवा याहीपेक्षा खालावू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. भारतालाही याचा गंभीरपणे विचार करावा लागणार असून बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागणार आहे, असा इशारा अनेक आहारतज्ञांनी दिला आहे.