सामनावीर कोहली, केएल राहुल यांची अर्धशतके – , लिटॉन दासचे झुंजार अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ ऍडलेड
विराट कोहलीचे स्पर्धेतील तिसरे अर्धशतक, केएल राहुलचे शानदार अर्धशतक व त्याने क्षेत्ररक्षणात दाखवलेली चपळता आणि पावसाच्या मदतीने भारताने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात बांगलादेशवर 5 धावांनी थरारक विजय मिळवित उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली. नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱया विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
कोहली (44 चेंडूत नाबाद 64) व बऱयाच कालावधीनंतर फॉर्म गवसलेला केएल राहुल (32 चेंडूत 50) यांची अर्धशतके आणि सूर्यकुमार यादवचे (30) उपयुक्त योगदान यांच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर निर्धारित 20 षटकांत 6 बाद 184 धावा फटकावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लिटॉन दासने जबरदस्त फटकेबाजी करीत नजमुल हुसेन शांतोसमवेत 7 षटकांत बिनबाद 66 धावांची मजल मारत भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. पावसाचा व्यत्यय आल्याने काही वेळ खेळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर बांगलादेशला 16 षटकांत 151 धावा काढण्याचे सुधारित उद्दिष्ट मिळाले. म्हणजे उर्वरित 9 षटकांत त्यांना 85 धावा काढावयाच्या होत्या. पण त्यांना 16 षटकांत 6 बाद 145 धावांवर रोखत भारताने 5 धावांनी रोमांचक विजय नोंदवला. या विजयानंतर भारताने गुणतक्त्यात 4 सामन्यांत 6 गुणांसह अग्रस्थानी झेप घेतली असून रविवारी भारताचा सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे.
दासचे फटकेबाजी
सुधारित उद्दिष्ट मिळाल्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी प्रयत्नांची शर्थ केली. दासने चौफेर फटकेबाजी करीत केवळ 27 चेंडूत 7 चौकार, 3 षटकारांसह 60 धावा झोडपताना सलामीसाठी शांतोसमवेत 68 धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकांत बांगलादेशला 20 धावांची गरज होती. या षटकात नुरुल हसनने एक षटकार व एक चौकार लगावला असला तरी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने शांत डोक्याने यॉर्कर लेंग्थ चेंडू टाकत भारताचा विजय साकार केला.
राहुलचे अप्रतिम क्षेत्ररक्षण
पावसामुळे खेळ थांबला होता, तेव्हा बांगलादेशने 7 षटकांत 66 धावा जमविल्या होत्या. त्यावेळी डीएलएस पद्धतीनुसार ते भारतापेक्षा 17 धावांनी पुढे होते. सामना रद्द झाल्यास बांगलादेशला विजय मिळू शकला असता. पण पाऊस थांबल्यानंतर खेळ पुन्हा झाल्यावर त्यांना सुधारित टार्गेट मिळाले. या ब्रेकनंतर बांगलादेशच्या मुमेंटमवर परिणाम झाला आणि डीप मिडविकेटवरून राहुलने केलेल्या थेट फेकीवर लिटॉन दास धावचीत झाला, तो क्षण भारतासाठी टर्निंग पॉईंट ठरला. आशिया चषक स्पर्धेत ज्याप्रमाणे मोहम्मद नवाझविरुद्ध कोणतीही योजना आखली नव्हती, तोच प्रकार लिटॉन दासच्या बाबतीत घडला. त्याने पावसाची शक्यता लक्षात घेत हुशारीने फटकेबाजी केली. कव्हर ड्राईव्ह, पुल, स्क्वेअरच्या मागील बाजूस षटकार मारत त्याने केवळ 21 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. बांगलादेशतर्फे नोंदवलेल्या सर्वोत्तम अर्धशतकांमध्ये दासच्या या अर्धशतकाची गणना होईल. पॉवरप्लेमध्ये बांगलादेशला त्याने बिनबाद 60 धावा फटकावून दिल्या. अर्शदीप सिंग व हार्दिक पंडय़ा यांनी अखेरच्या टप्प्यात नियंत्रित मारा करीत बांगलादेशला विजयापासून रोखण्यात यश मिळविले. दोघांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले तर शमीने नजमुल शांतोचा बळी मिळविला.
कोहलीचे स्पर्धेतील तिसरे अर्धशतक
तत्पूर्वी, कोहलीसाठी आजवर लकी ठरलेले ऍडलेड मैदान पुन्हा एकदा लाभदायक ठरले. त्याच्या फटकेबाजीला बांगलादेशचा एकही गोलंदाज रोखू शकला नाही. रोहित (2) स्वस्तात बाद झाल्यानंतर त्याने 44 चेंडूत 8 चौकार, एक षटकार ठोकत नाबाद 64 धावा फटकावताना राहुलसमवेत दुसऱया गडय़ासाठी 67 धावांची तर सूर्यकुमार यादवसमवेत तिसऱया गडय़ासाठी 38 धावांची भागीदारी केल्या. राहुलने या स्पर्धेतील पहिले अर्धशतक नोंदवताना 32 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 50 धावा केल्या. राहुलने पहिल्या 21 धावा 20 चेंडूत काढल्या. पॉवरप्ले संपल्यानंतर त्याने धावांचा वेग वाढवला. नवव्या षटकात शोरिफुलला त्याने पुल व स्लॅशचे दोन षटकार मारत एकूण 24 धावा वसूल केल्या. त्याच्या पुढील 29 धावा केवळ 10 चेंडूत फटकावल्या. मुस्तफिजूरने एका हुकलेल्या फटक्यावर त्याला झेलबाद केले. सूर्याने नेहमीप्रमाणे आक्रमण करीत 16 चेंडूत 4 चौकारांसह 30 धावा फटकावल्या. कोहलीने नंतर सातव्या गडय़ासाठी अश्विनसमवेत 11 चेंडूत 27 धावांची भर घातली. अश्विनने 6 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह नाबाद 13 धावा काढल्या. शकीब अल हसनने राहुल व सूर्या यांचे बळी मिळविले. पण तस्किन अहमदने किफायतशीर मारा करीत 4 षटकांत केवळ 15 धावा दिल्या. मात्र सर्वात यशस्वी ठरला तो हसन मेहमूद. त्याने 47 धावांत 3 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकांत 6 बाद 184 ः राहुल 50 (32 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), रोहित 2, कोहली नाबाद 64 (44 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), सूर्यकुमार यादव 30 (16 चेंडूत 4 चौकार), हार्दिक पंडय़ा 5, दिनेश कार्तिक 7, अक्षर पटेल 7, अश्विन नाबाद 13 (6 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 6. गोलंदाजी ः हसन मेहमूद 3-47, शकीब हसन 2-33, तस्किन अहमद 0-15, शोरिफुल 0-57.
बांगलादेश 20 षटकांत 6 बाद 145 ः नजमुल हुसेन शांतो 21 (25 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), लिटॉन दास 60 (27 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), शकीब हसन 13 (12 चेंडूत 2 चौकार), अफिफ हुसेन 3, यासिर अली 1, नुरुल हसन नाबाद 25 (14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), मोसद्देक हुसेन 6, तस्किन अहमद नाबाद 12 (7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 4. गोलंदाजी ः अर्शदीप 2-38, हार्दिक 2-28, शमी 1-25.