सामनावीर कोहलीचे नाबाद अर्धशतक, अर्शदीप-हार्दिकचे 3-3 बळी
वृत्तसंस्था/ मेलबर्न
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या रोमांचक सामन्यात भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4 गडय़ांनी पराभव करून सनसनाटी विजय साकार केला. चेसमास्टर विराट कोहलीची मॅचविनिंग नाबाद अर्धशतकी खेळी आणि त्याने हार्दिक पंडय़ासमवेत केलेली शतकी भागीदारी भारताच्या विजयासाठी निर्णायक ठरली
पाकला प्रथम फलंदाजी मिळाल्यावर अर्शदीप सिंग व हार्दिक पंडय़ा यांच्या भेदक माऱयासमोर त्यांना 20 षटकांत 8 बाद 159 धावांपर्यंत मजल मारता आली. शान मसूद व इफ्तिखार अहमद यांच्या अर्धशतकांचा त्यात मुख्य वाटा होता. त्यानंतर भारताने 20 षटकांत 6 बाद 160 धावा जमवित विजय साकार केला. वास्तविक भारताची स्थिती 6.1 षटकांत 4 बाद 31 अशी झाल्यानंतर भारताचा विजय कठीण वाटू लागला होता. पण कोहलीने हार्दिकला साथीला घेत 113 धावांची भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर काढले आणि विजयाची संधीही निर्माण करून दिली. शेवटच्या 8 चेंडूत 28 धावांची गरज असताना त्याने रौफला दोन षटकार ठोकत शेवटच्या 6 चेंडूत 16 अशी स्थिती आणली. शेवटच्या षटकातही त्याने नवाझला एक षटकार ठोकत विजय सोपा केला. नवाझवर दडपण आल्याने त्याने या षटकात दोन वाईड व एक चेंडू नोबॉल टाकला, त्याचाही भारताला फायदा झाला. शेवटच्या चेंडूवर अश्विनने विजयी धाव घेतल्यानंतर जल्लोष सुरू झाला. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या 60000 भारतीय प्रेक्षकांनी चक दे इंडियाचा जयघोष सुरू केला. मागील वर्षी झालेल्या एकमेव पराभवानंतर वर्ल्ड कपमधील पाकवरील विजयी मालिका भारताने या सामन्यातून पुन्हा पुढे सुरू केली आहे.
किंग कोहली इज बॅक
मॅच विनिंग खेळी केल्यानंतर कोहली पुन्हा एकदा चाहत्यांच्या गळय़ातील ताईत बनला असून ट्विटरवर त्याच्याच कौतुकाचे संदेश फिरू लागले आहेत. बऱयाच काळापासून तो खराब फॉर्ममध्ये चालला होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्याची चर्चाही होऊ लागली होती. आशिया चषक स्पर्धेत त्याला सूर गवसला आणि अफगाणविरुद्ध त्याने टी-20 मधील पहिले शतक नोंदवल्यानंतर त्याचा आत्मविश्वास बळावला. त्याचा या सामन्यात त्याने पुरेपूर उपयोग केला. 53 चेंडूतील नाबाद 82 धावांची विजयी खेळी करीत त्याने टीकाकारांची तोंडेही बंद केली आहेत. त्याच्या खेळीत 6 चौकार, 4 षटकारांचा समावेश होता. हार्दिकने त्याला चांगली साथ देत 37 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह 40 धावा जमविल्या.
भारताची खराब सुरुवात
160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची खराब सुरुवात झाली. केएल राहुल (4) व कर्णधार रोहित शर्मा (4) 10 धावांतच तंबूत परतल्यानंतर बहरात असलेला सूर्यकुमार यादवही 10 चेंडूत 15 काढून माघारी परतला. सातव्या षटकातील पहिल्या चेंडूवर अक्षर पटेल (2) बाद झाल्यानंतर 4 बाद 31 अशी भारताची स्थिती झाली. कोहली व हार्दिक यांनी नंतर निर्णायक शतकी भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला. पाकच्या हॅरिस रौफ व मोहम्मद नवाझ यांनी प्रत्येकी 2 तर नसीम शाहने 1 बळी मिळविला. शाहीन शाह आफ्रिदीकडून मात्र निराशा झाली. त्याने एकही बळी न मिळविता 34 धावा दिल्या.
मसूद, इफ्तिखार यांची अर्धशतके
तत्पूर्वी, अर्शदीप सिंग व हार्दिक पंडय़ा यांनी भेदक मारा केल्याने पाकला 8 बाद 159 धावा जमविता आल्या. अर्शदीपने 32 धावांत 3 बळी मिळविताना बाबर आझम (0), फॉर्ममध्ये असलेला मोहम्मद रिझवान (4) यांना आपल्या पहिल्या षटकात बाद केले. इफ्तिखार अहमदने अर्धशतकी खेळी कताना भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर शान मसूदने अर्धशतक नोंदवले तरी त्याला झगडावे लागले. त्याने 42 चेंडूत 5 चौकारांस 52 तर इफ्तिखारने 34 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह 51 धावा फटकावल्या. या दोघाव्यतिरिक्त शाहीन शाह आफ्रिदीने 16 धावा जमविल्या. इतरांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. हार्दिकने 30 धावांत 3 तर शमी व भुवनेश्वर यांनी एकेक बळी टिपला. अक्षर पटेलच्या एका षटकात 21 धावा वसूल केल्या गेल्या.
याआधी बरोबर 364 दिवसापूर्वी भारताला पाककडून टी-20 विश्वचषक स्पर्धेत 10 गडय़ांनी सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाची परतफेडही भारताने या सामन्यात केली.
संक्षिप्त धावफलक ः पाकिस्तान 20 षटकांत 8 बाद 159 ः शान मसूद 52 (42 चेंडूत 5 चौकार), इफ्तिखार अहमद 51 (34 चेंडूत 2 चौकार, 4 षटकार), शाहीन आफ्रिदी 16 (8 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), बाबर आझम 0, रिझवान 4, शदाब खान 5, हैदर अली 2, नवाझ 9, असिफ अली 2, रौफ 6, अवांतर 12. गोलंदाजी ः अर्शदीप सिंग 3-32, हार्दिक पंडय़ा 3-30, भुवनेश्वर 1-22, शमी 1-25, अश्विन 0-23.
भारत 20 षटकांत 6 बाद 160 ः केएल राहुल 4, रोहित शर्मा 4, विराट कोहली नाबाद 82 (53 चेंडूत 6 चौकार, 4 षटकार), सूर्यकुमार यादव 15 (10 चेंडूत 2 चौकार), अक्षर पटेल 2, हार्दिक 40 (37 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), दिनेश कार्तिक 1, अश्विन 1, अवांतर 11. गोलंदाजी ः रौफ 2-36, नसीम शाह 1-23, नवाझ 2-42.
कोट्स
मोहालीत 82 चेंडूत 82 धावा केल्या होत्या, याआधी ती माझी सर्वोत्तम खेळी असल्याचे म्हणत होतो. पण आजची खेळीही सर्वोत्तम आहे, असे मी म्हणेन. या खेळीचे वर्णन करण्यास शब्द सुचत नाहीत. दोन्ही डाव माझ्यासाठी स्पेशल आहेत.
–सामनावीर विराट कोहली
टार्गेट छोटे असले तरी ते गाठणे कठीण होते. विराट व हार्दिकची भागीदारी आमच्यासाठी निर्णायक ठरली. टार्गेट समोर असेल तर चेसमास्टर विराट नेहमीच त्यात चमक दाखवतो.
-कर्णधार रोहित शर्मा