नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एस. अँड पी. या जागतिक संस्थेने भारताचा विकास दर विद्यमान आर्थिक वर्षात 7.3 टक्के राहील असा दिलासादायक निष्कर्ष काढला आहे. कोरोनापूर्व काळात भारताची अर्थव्यवस्था साधारणतः याच दराने विकसीत होत होती. कोरोनाच्या उद्रेकामुळे दोन वर्षांमध्ये आर्थिक मंदगतीशी दोन हात करावे लागले. मात्र, आता ती पूर्ण वेगाने कार्यरत होण्याची शक्यता आहे.
मात्र त्याच बरोबर भारताला महागाईकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असा इशाराही एस. अँड पी. ने दिला आहे. महगाई दर विद्यमान आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेच्या अधिकतर अनुमानापेक्षाही जास्त राहील. त्यामुळे विकासाला काहीशी खीळ बसण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्पादनवाढीवरही लक्ष केंद्रीत करावे लागेल. भारताच्या अर्थव्यवस्थेला यापुढच्या वर्षांमध्ये देशांतर्गत मागणीत झालेल्या वाढीमुळेच आधार मिळेल असे भाकितही या संस्थेने तिच्या अहवालात केले आहे.
अन्न धान्य महागाई येत्या काळात पुन्हा वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. गहू आणि तांदळाचे उत्पादन यंदा किती येते यावर प्रामुख्याने अन्न धान्याचे दर अवलंबून असतील. खरीप हंगामात यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी काही भागांमध्ये तो कमी पडला आहे. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनावर काही प्रमाणात नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. या बाबींचा उल्लेखही अहवालात करण्यात आला असून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.