जर्मनीला टाकले मागे : भारत चौथ्या स्थानी ः ओआयसीए संघटनेच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुहेरी अंकातील म्हणजे 28 टक्के विक्री विकासाच्या माध्यमातून भारत हा वाहन बाजारपेठेच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर मुसंडी मारण्यात यशस्वी झाला आहे. भारताने वाहन बाजारपेठेच्या स्पर्धेत याआधी चौथ्या क्रमांकावर असणाऱया जर्मनीला मागे टाकले आहे.
कोरोना महामारीने जागतिक स्तरावर ऑटो क्षेत्रावरती मोठा परिणाम घडवून आणला आहे. या लाटेमध्ये सर्वच देशांना कमी अधिक प्रमाणात आव्हाने स्वीकारावी लागली आहेत. जागतिक वाहन विक्रीचा आढावा नुकताच ऑर्गनायझेशन ऑफ मोटर व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स (ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल डेस कन्स्ट्रक्टर ऑफ ऑटोमोबाईल) (ओआयसीए) यांनी प्रसिद्ध केला होता. सदरच्या अहवालामध्ये भारताने जर्मनीला मागे टाकत वाहनांच्या बाजारपेठेत चौथा क्रमांक पटकावला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2021 मध्ये 37 लाख वाहनांची विक्री
भारताने 2021 मध्ये 37 लाख 59 हजार 398 वाहनांची विक्री केली आहे. जर्मनीने 29 लाख 73 हजार 319 वाहनांची विक्री सदरच्या वर्षात केली आहे. जवळपास 26 टक्के इतकी वाढीव वाहन विक्रीची नोंदणी जर्मनीच्या तुलनेमध्ये भारताने नोंदविली आहे. 2019 मध्ये भारताने पहिल्यांदाच चौथे स्थान पटकाविले होते आणि आता 2025 पर्यंत तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू झाली आहे.
तिसरे स्थान घेण्याची संधी
सध्याला अग्रस्थानी चीन, दुसऱया स्थानी अमेरिका आहे. जपानने 2021 मध्ये 44 लाख 48 हजार 340 वाहनांची विक्री केली आहे. हा विक्रीचा टप्पा आगामी काळात पार केल्यास भारताला तिसरे स्थान काबीज करणे कठीण नक्कीच नसणार आहे. भारतीय वाहन बाजारपेठेचा मागणीचा विचार केल्यास प्रत्येक हजार व्यक्तींमागे 33 वाहने घेतली जातात असे दिसून आले आहे.
ओआयसीएबद्दल
ही संघटना फ्रान्सच्या पॅरीसमध्ये 1919 मध्ये अस्तित्वात आली ज्यात 37 देशांतील ऑटो संघटनांचा सहभाग आहे.
10 लाखावरील कार्सना मागणी
अनेक आव्हाने पेलताना पुरवठा साखळी संदर्भातल्या अडचणी त्याचप्रमाणे कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीचा परिणाम विक्रीवर प्रकर्षाने दिसतो. क्रिसिल या संस्थेने अलीकडेच एक पाहणी केली होती, भारतीय कार ग्राहकांचा कल बदलला असून 10 लाख रुपयेपेक्षा अधिकच्या कार खरेदी करणाऱयांची संख्या जास्त आहे.