थोडीशी कल्पकता आणि निर्धार दाखविल्यास विज्ञान-तंत्रज्ञानात मोठी प्रगती साध्य करता येते, हे भारताने दाखवून दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारताला आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला असून अनेक युवक यामुळे प्रभावित झाले आहेत. आतापर्यंत ज्या वस्तू भारताला आयात कराव्या लागत होत्या, त्यापैकी शक्य तितक्या वस्तूंची निर्मिती भारतातच करण्यासाठी आता त्यांची धडपड सुरू झालेली आहे. अनेकांना यशही मिळत आहे. नॅनो युरिया हा असाच एक देशाला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेणारा पदार्थ आहे. पूर्णतः भारतात निर्माण करण्यात आलेल्या या नॅनो युरिया तंत्रज्ञानाला आता जगभरात मागणी आहे.
नेहमीच्या युरियापेक्षा हा युरिया पाण्यात त्वरित विरघळतो आणि पिकांच्या मुळाद्वारे याचे शोषण जास्तीत जास्त प्रमाणात होत असल्याने तो वाया जात नाही. तसेच ओढे आणि नद्यांच्या पाण्यामध्ये मिसळून पर्यावरणाची हानीही अतिशय कमी प्रमाणात त्याच्यामुळे होते. परिणामी तो वाजवीपेक्षा अधिक प्रमाणात उपयोगात आणावा लागत नाही. आता दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया खंडातील अनेक देश, मध्य-पूर्वेतील देश इत्यादी देशांमध्ये हा बाटलीबंद नॅनो युरिया लोकप्रिय झालेला आहे. त्यामुळे एकंदर उत्पादनाच्या 15 टक्के निर्यात करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवलेले आहे. गेल्या काही महिन्यात ब्राझिल, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश इत्यादी देशांनी नॅनो युरिया भारताकडून आयात केलेला आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असून भविष्यकाळात त्याचे उत्पादन आणि निर्यात अधिक प्रमाणात वाढविण्याचा भारताचा विचार आहे.