चिनी हेरगिरी जहाजाचे प्रकरण ः ड्रगनला बसला हादरा
वृत्तसंस्था / कोलंबो
श्रीलंकेतील बंदरावर चीनच्या ‘हेरगिरी जहाजा’वरून गोंधळाची स्थिती कायम आहे. भारताने चीनच्या या जहाजावरून आक्षेप नोंदविला होता. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेवर दबाव निर्माण झाला आहे. श्रीलंकेने चीनला या जहाजाचा दौरा टाळण्यास सांगितले आहे. याकरता चिनी दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱयांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. चीनचे हेरगिरी करणारे जहाज हे हंबनटोटा बंदरावर तळ ठोकणार होते.
स्पेस अँड सॅटेलाइट ट्रकिंग रिसर्च वेसेल (जहाज) 11-17 ऑगस्टपर्यंत बंदरावर नांगर टाकणार होते. पुढील निर्णयापर्यंत हंबनटोटामध्ये येणारे जहाज रोखण्यात यावे असे पत्र श्रीलंकेच्या विदेश मंत्रालयाने चीनच्या दूतावासाला लिहिले आहे. राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे चिनी राजदूतासोबत बंद कक्षात बैठक करणार असल्याचे वृत्त आहे.
श्रीलंकेतील मागील गोटाबाया राजपक्षे सरकारने या चिनी जहाजाला अनुमती दिली होती. श्रीलंकेतून पलायन करण्याच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी हे पाऊल उचलले होते. चीनचे हे जहाज केवळ रीफ्यूलिंगसाठी थांबणार असल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. परंतु हे जहाज किमान 7 दिवसांसाठी हंबनटोटामध्ये तळ ठोकणार असल्याची माहिती समोर आली होती. याचमुळे भारताने आक्षेप नोंदविला होता.
चीनच्या या जहाजावर भारत करडी नजर ठेवणार आहे आणि गरज भासल्यास कठोर पावले देखील उचलणार असल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले होते. हंबनटोटा बंदर तामिळनाडूपासू अत्यंत नजीक आहे. चिनी जहाज 7 दिवसांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करू शकत होते. तर आंध्रप्रदेशातील भारताचे प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा देखील हंबनटोटापासून फार दूर नसल्याने चिंता वाढली होती.