इस्लामिक संघटनेच्या पवित्र्यावर परराष्ट्र मंत्रालयाने फटकारले ः वादग्रस्त विधानावरून अरब देशात गदारोळ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मोहम्मद पैगंबर यांच्यासंबंधी भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) घेतलेल्या पवित्र्याचा भारताने तीव्र शब्दात निषेध केला आहे. ‘ओआयसी सचिवालयाच्या अनावश्यक आणि लहान मनाच्या टिप्पण्या भारत स्पष्टपणे नाकारतो. भारत सरकार सर्व धर्मांचा आदर करते,’ असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आखाती देशांनी भाजप नेते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पैगंबर मोहम्मदवरील वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबतही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यांनी स्पष्टीकरण देत ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला आहे.
ओआयसी या संघटनेने भारताबाबत केलेले वक्तव्य आम्ही पाहिले आहे. सरकारने ओआयसी सचिवालयाचे खोटे आणि विचित्र विधान नाकारले. भारत सरकार सर्व धर्मांना सर्वोच्च आदर करते. काही लोकांनी धार्मिक व्यक्तिमत्त्वाचा अपमान करणारे आक्षेपार्ह ट्विट आणि विधाने केली होती. ही वादग्रस्त विधाने भारत सरकारच्या मताशी संबंधित नाहीत. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई केली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोमवारी स्पष्ट केले.
नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यावर आखाती देशांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कतार, कुवेत आणि इराणने भारतीय राजदूतांना बोलावून निषेध व्यक्त केला आहे. या वक्तव्यावर कतार-कुवेतने भारत सरकारने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर सौदी अरेबियानेही या विधानावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, 57 मुस्लीम देशांच्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशननेही (ओआयसी) निषेध केला आहे. मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ओआयसीच्या विधानावर आक्षेप घेत भारत ओआयसी सचिवालयाच्या अनावश्यक आणि संकुचित विचारांच्या टिप्पण्यांना स्पष्टपणे नाकारतो, असे प्रत्युत्तर दिले. तसेच भारत सरकार सर्व धर्मांचा आदर करत असल्याचेही स्पष्ट केले.
टीव्हीवरील एका चर्चेत भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. सदर टिप्पणीचा मुस्लीम समुदाय सातत्याने विरोध करत आहे. शर्मा यांच्यावर महाराष्ट्रासह अनेक राज्यांत गुन्हेही दाखल झाले आहेत. मोहम्मद पैगंबर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपने तत्काळ कारवाई करत प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले. यानंतर भारताने एक निवेदन जारी करून जे काही चुकीचे चित्रण केले गेले आहे ती भारत सरकारची अधिकृत भूमिका नाही. यासोबतच वादग्रस्त विधान करणाऱया नेत्यांची हकालपट्टी करण्यावरही सरकारने भर दिला. आम्ही सर्व धर्म आणि त्यांच्या उपासकांचा आदर करतो, असे विधानही भाजपने जारी केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी एक पत्र जारी करत भाजप हा सर्व धर्मांचा आदर करणारा पक्ष असल्याचे रविवारीच सांगितले होते. सौदी अरेबिया आणि बहरीनने भारताच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
आखाती देशांमध्ये 76 लाख भारतीय
भारत आणि आखाती देशांमधील संबंध ऐतिहासिकदृष्टय़ा खूप मजबूत आहेत. भारत आपल्या तेलाच्या गरजेचा मोठा हिस्सा या देशांकडून आयात करतो, या व्यतिरिक्त, परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सुमारे 76 लाख भारतीय मध्य पूर्व देशांमध्ये काम करतात. कोरोना महामारीच्या दुखापतीतून भारतीय अर्थव्यवस्था अद्याप पूर्णपणे सावरलेली नाही. अशा स्थितीत हे प्रकरण अधिक ताणल्यास देशाच्या आर्थिक आरोग्याला मोठे नुकसान होऊ शकते.
नुपूर शर्मांकडून विधान बिनशर्त मागे
भाजपमधून निलंबित झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे. शर्मा यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. टीव्ही डिबेटमध्ये देवाविरोधात वादग्रस्त शब्द बोलले जात होते. हे बोल सहन न झाल्याने मी रागाच्याभरात आक्षेपार्ह बोलून गेले. साहजिकच चूक लक्षात आल्यामुळे माझे विधान मी बिनशर्त परत घेते, असे नुपूर शर्मा म्हणाल्या.
नुपूर शर्मांना धमक्मया, एफआयआर नोंद
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे धमक्या देत त्यांना त्रास दिला जात आहे. नुपूर शर्मा यांना मिळणाऱया धमक्मयांविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याचे अधिकाऱयांनी सोमवारी सांगितले. पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध भादंविच्या काही कलमांतर्गंत तक्रार दाखल करत तपास सुरू केला आहे.