केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन
वॉशिंग्टन ः कोरोना महामारी ओसरल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था सध्या पूर्णपणे सावरत असून मजबुती प्राप्त करत आहे. यासोबतच देशाची वाटचाल ही आर्थिक वृद्धीच्या दिशेने राहणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक वर्ल्ड बँक यांच्या वार्षिक बैठकीच्या दरम्यान केले आहे.
शोध संस्था अटलांटिक कौन्सिल यांच्या एका सार्वजनिक कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. भारताने कोरोना संसर्गाला कशी टक्कर दिली आणि त्यासाठी कोणकोणते उपाय केले यांचीही सविस्तर माहिती यावेळी मंत्री सीतारामन यांनी दिली.
सर्वात मोठे तीन डिजिटल प्लॅटफॉर्म
सदर कार्यक्रमप्रसंगी जगातील तीन सर्वात मोठे सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्म समोर आले आहेत. यामध्ये आधार, युपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस)आणि कोविन यांचा समावेश आहे. युपीआय हे सर्वात मोठे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आहेत. तर कोविन हा सर्वात मोठा लसीकरण प्लॅटफॉर्म राहिला असल्याची माहिती यावेळी दिली आहे.
आगामी दशकाकडे लक्ष
महामारी आणि त्यानंतरची स्थिती सावरण्यासाठी व नव्याने अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून आगामी दशक समोर ठेवत नियोजन करण्यात येणार असून निश्चित
स्वरुपात भारताची आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर देणार असल्याचा दावा अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.