पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे आल्यानंतर नाराज झालेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सध्या काँग्रेसकडून केला जात आहे. हे पाहता नितीश पुन्हा इंडिया आघाडीत सक्रिय दिसणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. वास्तविक इंडिया आघाडीचे प्राऊप तयार करण्यात नितीश यांचा मुख्य वाटा राहिलेला आहे. इंडिया आघाडीतील नेत्यांना एकत्र आणण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पण, गेल्या काही दिवसांत नितीशकुमार हे इंडिया आघाडीपासून काहीसे अंतर राखून असल्याचे दिसून आले. मागच्या 19 डिसेंबरला दिल्लीत झालेली इंडिया आघाडीची बैठक व त्यातील चर्चा ही त्यांच्या नाराजीचे मुख्य कारण मानले जाते. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनुमोदन दिले होते. बहुतेक घटक पक्षांनीही खर्गे यांच्या नावाबाबत सहमती दर्शविली होती. त्यामुळे नितीश दुखावले गेले, असे म्हणण्यास जागा आहे. इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचे प्रारंभी त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, राजकारण्यांचा सूप्त हेतू काय असेल, हे कुणी सांगू शकत नाही. तसे पाहिल्यास 2019 च्या निवडणुकीआधीच विरोधी पक्षाचे नेते म्हणून नितीश यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घेतले जात होते. परंतु, तत्पूर्वीच त्यांनी राजदशी असलेली युती तोडत भाजपाशी घरोबा केला. त्यानंतर विधानसभेत पीछेहाट होऊनही भाजपाच्या कृपेने ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र, अलीकडेच त्यांनी राजदशी परत एकदा सोयरिक केली. सातत्याने भूमिका बदलण्याच्या या सवयीमुळे बिहारचे विकासपुऊष अशी जाणीवपूर्वक निर्माण झालेली त्यांची ओळख हळूहळू पुसट होत चालली आहे. विश्वासार्हता डळमळीत बनलेल्या नितीशबाबूंनी इंडिया आघाडीसाठी पुढाकार घेऊन आपला वेगळेपणा व लढाऊपणा दाखविण्याचा प्रयत्न केला खरा. पण, तो तरी किती अस्सल आहे, हे त्यांनाच ठावे. पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळते, खर्गेंचे नाव अवचितपणे पुढे येते नि नितीश नाराज होतात, ही तशी साधी सरळ घटना. तथापि, उद्या वेळ आली, तर नितीश पुनश्च भाजपाच्या गोटात जाऊ शकतील, अशा शंकाकुशंका निर्माण होते. यातच सर्व आले. नितीश यांच्या संयुक्त जनता दलाचा पूर्वी बिहारमध्ये दबदबा होता. परंतु, 2020 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची मोठी पीछेहाट झाली. राजद व भाजपाने अनुक्रमे 75 व 74 जागा खेचल्या असताना संजदला मात्र 43 जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतरही त्यांना राज्याच्या प्रमुखपदाची खुर्ची मिळाली असली, तरी पक्ष म्हणून संजद मागे पडल्याचे दिसून येते. तरीही शक्तिशाली भाजपाशी लढण्यासाठी काँग्रेस व इतर घटक पक्षांना नितीश आवश्यक वाटतात. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. या जागा खेचायच्या असतील, तर या पक्षाची मदत लागेलच. याशिवाय लगतच्या अन्य राज्यातही संजदचा म्हणून मतदार आहे. त्यास दुखावून चालणार नाही, या निर्णयाप्रत काँग्रेस व मित्रपक्ष आले आहेत. त्यातूनच नितीश यांना चुचकारण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांना इंडिया आघाडीचे संयोजक वा समकक्ष पद देण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे समजते. हे बघता पुढच्या टप्प्यात काँग्रेस व इतर घटक पक्ष काय करतात, हे पहावे लागेल. आघाडीत जवळपास 28 पक्ष आहेत. असे पद त्यांना द्यायचे झाले, तर या सर्वांमध्ये आधी सहमती घडवावी लागेल. मुळात बिहारमधील काँग्रेस नेते याबाबत आग्रही दिसतात. निवडणुकीत यश मिळवायचे असेल, तर त्यांची साथ लागेल, अशी या मंडळींची भूमिका असून, त्यांनी त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळेच याबाबत एरवी मरगळलेल्या काँग्रेसने तातडीने हालचाली केल्याचे पहायला मिळते. दुसरीकडे जागावाटपाचा मुद्दाही गांभीर्याने घेत काँग्रेसने हातपाय हलवायला सुऊवात केली आहे. गुऊवारी चार जानेवारी रोजी खर्गे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व सरचिटणीस यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जागावाटपाबरोबरच भारत न्याय यात्रेसंदर्भात ऊहापोह होणार आहे. इंडिया आघाडीसाठी जागा वाटप हा अतिशय जटील मुद्दा असेल. काही राज्यांमध्ये काँग्रेस व संबंधित पक्षांमध्येच राजकीय स्पर्धा आहे. तेथे नेमकी काय भूमिका घ्यायची, हेही पक्षास ठरवावे लागेल. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्याबाबत अद्यापही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. त्याविषयीची भूमिका या बैठकीत ठरणार का, याबाबतही औत्सुक्य आहे. राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा येत्या 14 जानेवारी रोजी मणिपूर येथून सुरू होत आहे. ही यात्रा 14 राज्यांतून जाणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणूनही काँग्रेसची ही बैठक महत्त्वाची असेल. एकीकडे 400 हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने जोरदार वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून, निवडणूक राममंदिराच्या मुद्द्याभोवतीच फिरत ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. भाजपाच्या या रणनीतीला इंडिया कोणत्या नीतीद्वारे उत्तर देणार, हे पहावे लागेल. काँग्रेसने ‘है तय्यार हम’चा नारा दिला असला, तरी आजघडीला भाजपाचे पारडे जड दिसते. राहुल गांधी व त्यांच्या ‘भारत न्याय यात्रे’द्वारे इंडिया आव्हान निर्माण करणार का, हेच आता बघायचे.