वृत्तसंस्था /नवी दिल्ली
स्पेनमधील ला नुसिया येथे सुरू असलेल्या युवा पुरुष आणि महिलांच्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या सात मुष्टियोद्धय़ांनी विविध वजनगटातून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पुरुष विभागात युवा आशियाई विजेते वंशज आणि विश्वनाथ सुरेश तसेच आशिष यांनी उपांत्यफेरीतील आपल्या लढती जिंकून अंतिम फेरीत स्थान घेतले आहे. महिलांच्या विभागात कीर्ती, भावना शर्मा, देविका घोरपडे, रविना यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पुरुषांच्या विभागात विश्वनाथ सुरेशने प्युर्तोरिकोच्या लोपेझचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 63.5 किलो गटात भारताच्या वंशजने अमेरिकेच्या क्रॉक लेमवर 3-2 तर 54 किलो वजनगटात आशिषने उझ्बेकच्या नॉर्टोजेव्हचा 4-3 असा पराभव केला.
महिलांच्या 81 किलोवरील वजनगटात भारताच्या कीर्तीने कझाकस्तानच्या ऍसेल टोक्टेसिनचा 3-2 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 63 किलो गटात रविनाने तर 48 किलो गटात भावना शर्माने उपांत्यफेरीच्या लढतीत अनुक्रमे कझाकस्तानच्या ऍसेम टेनाटेर आणि बुरीबायेव्हा यांचा पराभव केला. 52 किलो गटात भारताच्या देविका घोरपडेने अमेरिकेच्या जॉयवर 4-1 अशा गुणांनी मात केली. या स्पर्धेत भारताच्या महिला मुष्टियोद्धय़ा तमन्नाने 50 किलो गटात, कुंजाराणी देवी थोंगमने 60 किलो गटात, मुस्कानने 75 किलो गटात तर 70 किलो गटात लाशू यादवने कांस्यपदके मिळविली. भारताच्या या महिला मुष्टियोद्धय़ांना उपांत्यफेरीत प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेमध्ये 73 देशांचे सुमारे 600 स्पर्धक सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पदकतक्त्यात भारत पहिल्या स्थानावर असून उझ्बेकने दहा पदकांसह दुसरे तर आयर्लंड आणि कझाकस्तान यांनी प्रत्येकी समान 7 पदकांसह संयुक्त तिसरे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत महिलांच्या विभागात कझाकस्तान आणि उझ्बेकस्तान यांच्या तुलनेत भारताने अधिक दर्जेदार कामगिरी करताना आठ पदके निश्चित केली आहेत. आता शुक्रवारी भावना आणि देविका हे स्पर्धक सुवर्णपदकासाठी लढत देतील. कझाकस्तानने 5 तर उझ्बेकने 4 पदके मिळविली आहेत.