बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये बजावली महत्त्वाची भूमिका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा पहिला हेर उपग्रह (स्पाय सॅटेलाईट) ‘आय इन द स्काय’ अखेर साडेतेरा वर्षांपर्यंत अंतराळातून देशाची देखरेख केल्यावर पृथ्वीवर परतला आहे. इस्रोचा हा रडार-इमेजिंग उपग्रह भारताचा पहिला स्पाय सॅटेलाईट आहे. 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांनंतर त्वरित हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता. 30 ऑक्टोबर रोजी हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरताच हिंदी महासागरीय क्षेत्रावर नष्ट झाला होता.
या उपग्रहाने देशाच्या सीमा तसेच सागरी क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक तसेच एअर स्ट्राईक करण्यासाठी महत्त्वपूर्ण तपशील पुरविला होता. सर्जिकल स्ट्राईकची योजना आखण्याकरता या उपग्रहाची मोठी मदत झाली होती. रिसॅट-2ने साडेतेरा वर्षांपर्यंत अनेक घुसखोरीविरोधी आणि दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
उपग्रहीय छायाचित्रांमुळे गुप्तचर यंत्रणांना 2016 मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे लाँच पॅड आणि फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट एअर स्ट्राईकची योजना आखण्यास मोलाची मदत झाली होती.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर रिसॅट-2 निर्मितीच्या कार्यक्रमाला वेग आला होता. भारताचा स्वदेशी उपग्रह रिसॅट-1 ला सी-बँड विकसित करण्यास विलंब होत होता. याचमुळे रिसॅट-2 उपग्रह रिसॅट-1च्या प्रक्षेपणाच्या तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2009 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. या उपग्रहाचा वापर हिंदी महासागर तसेच अरबी समुद्रातील शत्रूशी निगडित नौकांना ट्रक करण्यासाठीही केला जात होता.