वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघ येत्या ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वेच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. विंडीजविरुद्ध मालिका संपल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेत दाखल होईल, अशी माहिती बीसीसीआयच्या प्रवक्त्याने दिली.
आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. उभय संघातील होणाऱया या वनडे मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट, दुसरा सामना 20 ऑगस्ट आणि तिसरा सामना 22 ऑगस्टला होणार आहे. झिम्बाब्वेच्या दौऱयासाठी भारताचा ब संघ पाठविला जाणार असून या संघासमवेत व्ही.व्ही.एस. लक्ष्मण प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहतील.
सध्या भारताचा संघ इंग्लंडमध्ये टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ विंडीजच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका आणि त्यानंतर 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार असून भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपविण्यात आले आहे. वनडे मालिकेसाठी भारतीय संघातून अव्वल खेळाडू विराट कोहली, जसप्रित बुमराह आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे.