बांगलादेशचा 188 धावांनी पराभव, कुलदीप यादव ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ चतोग्राम
भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सलामी देताना पहिल्या सामन्यात रविवारी शेवटच्या दिवशी यजमान बांगलादेशचा 188 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करत 8 गडी बाद करणाऱया फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. कर्णधार शकीब अल हसनचे चिवट अर्धशतक तसेच झाकीर हसनचे शतक बांगलादेशला पराभवापासून रोखू शकले नाही.
या कसोटीमध्ये भारताने पहिल्या डावात 404 धावा जमविल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 150 धावात आटोपल्याने भारताने 254 धावांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली. त्यानंतर गिल आणि पुजारा यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित करून बांगलादेशला निर्णायक विजयासाठी 513 धावांचे कठीण आव्हान दिले. शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशी बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीला समर्थपणे तोंड देत दिवसभरात सहा गडय़ांच्या मोबदल्यात 272 धावापर्यंत मजल मारली होती. सलामीच्या झाकीर हसनने शतक झळकविले होते. त्यानंतर कर्णधार शकीब अल हसनने चिवट फलंदाजी करीत संघाचा पराभव थोडा लांबवला. शकीब अल हसन आणि मेहदी हसन मिराज या जोडीवर बांगलादेशची भिस्त होती पण रविवारच्या शेवटच्या दिवशी खेळाला प्रारंभ झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केवळ 11.2 षटकात बांगलादेशचे उर्वरित चार फलंदाज 48 धावात बाद केले. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने रविवारच्या खेळामध्ये बांगलादेशचे दोन फलंदाज बाद केले. तर मोहमद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. कुलदीप यादवने या सामन्यात पहिल्या डावात 5 तर दुसऱया 3 असे एकूण 113 धावात 8 गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमधील कुलदीपची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या सामन्यात कुलदीप यादवला अक्षर पटेलकडून चांगली साथ मिळाली. अक्षर पटेलने बांगलादेशच्या दुसऱया डावात 77 धावात 4 गडी बाद केले.
या विजयामुळे भारताने आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसऱया स्थानावर झेप घेतली असून लंका चौथ्या स्थानावर आहे. भारताने 87 गुण मिळवले असून लंकेने 64 गुण नोंदवले आहेत. ऑस्ट्रेलिया पहिल्या तर दक्षिण आफ्रिका दुसऱया स्थानावर आहे.
6 बाद 276 या धावसंख्येवरून बांगलादेशने आपल्या दुसऱया पुढे सुरुवात केली. कर्णधार शकीब अल हसनने आक्रमक फलंदाजीवर अधिक भर दिला. सिराजने बांगलादेशची ही जोडी फोडताना मेहदी हसनला यादवकरवी झेलबाद केले. त्याने 3 चौकारासह 13 धावा जमवल्या. अनुभवी शकीब अल हसनने 108 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारासह 84 धावा झळकवल्या. शकीबने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार ठोकून आपले कसोटीतील 30 वे अर्धशतक झळकविले. कर्णधार राहुलने गोलंदाजीत बदल करून कुलदीपकडे चेंडू सोपवला. कुलदीपने आपल्या सलग दोन षटकात बांगलादेशचे दोन फलंदाज बाद केले. यादवने शकीब अल हसनचा त्रिफळा उडवला. त्यानंतर त्याने इबादत हुसेनला खाते उघडण्यापूर्वीच अय्यरकरवी झेलबाद केले. अक्षर पटेलने तैजूल इस्लामचा 4 धावांवर त्रिफळा उडवून बांगलादेशचा डाव 324 धावावर रोखला. भारतातर्फे अक्षर पटेलने 4 तर कुलदीप यादवने 3 तसेच सिराज, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आता या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी 22 डिसेंबरपासून मिरपूर येथे खेळवली जाईल.
संक्षिप्त धावफलक ः भारत प. डाव 404, बांगलादेश प. डाव 150, भारत दु. डाव 2 बाद 258 डाव घोषित, बांगलादेश दु. डाव 113.2 षटकात सर्व बाद 324 (झाकीर हसन 100, नजमूल हुसेन 67, शकीब अल हसन 84, मुशफिकुर रहीम 23, लिटॉन दास 19, मेहदी हसन मिराज 13, अक्षर पटेल 4-77, कुलदीप यादव 3-73, सिराज 1-67, उमेश यादव 1-27, रविचंद्रन अश्विन 1-75).