20 लढाऊ विमाने, 32 क्षेपणास्त्र, एके-630 तोफेने असणार सज्ज
वृत्तसंस्था/ कोची
देशातील पहिली स्वदेशी विमानवाहूक युद्धनौका आयएनएस विक्रांत शुक्रवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. केरळमधील कोची येथे 2 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण सोहळा पार पडणार आहे.
आयएनएस विक्रांतच्या निर्मितीमुळे भारत अशा 6 निवडक देशांच्या शेणीत सामील झाला आहे, जे 40 हजार टन वजनाची विमानवाहू युद्धनौका निर्माण करण्याची क्षमता बाळगून आहेत. यापूर्वी अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांकडेच ही क्षमता होती. आयएनएस विक्रांत भारताच्या ताफ्यात सामील झाल्याने हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता तसेच स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत मिळणार असल्याचे नौदलाने म्हटले आहे.
विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवर 30 विमाने तैनात असतील, ज्यातील 20 लढाऊ विमाने असणार आहेत. याचबरोबर 10 हेलिकॉप्टर्स या युद्धनौकेवर असणार आहेत. आयएनएस विक्रांतवर सध्या मिग-29 के (ब्लॅक पँथर) लढाऊ विमान तैनात केले जाईल. काही काळानंतर डीआरडीओ अन् एचएएलकडून निर्माण केले जाणारे टीईडीबीएफ म्हणजेच टूइन इंजिन डेक बेस्ड फायटर जेट तैनात करण्यात येणार आहे. टीईडीबीएफची निर्मिती पूर्ण होण्यास काही वर्षे लागणार असल्याने अमेरिकेचे एफ-18ए सुपर हॉर्नेट किंवा फ्रान्सचे राफेल (एम) तैनात केले जाऊ शकते. या दोन्ही लढाऊ विमानांचे परीक्षण सुरू झाले आहे. अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर कुठले लढाऊ विमान तैनात करण्यात यावे याचा निर्णय घेतला जाणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यापासून मिग-29 के लढाऊ विमान आयएनएस विक्रांतवर तैनात करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
आयएनएस विक्रांतचे फ्लाय-डेक म्हणजेच रनवेला स्कीइंग तंत्रज्ञानावर तयार करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाला शॉर्ट टेकऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी म्हणजेच स्टोबार देखील म्हटले जाते. छोटय़ा धावपट्टीद्वारे स्कीइंगच्या माध्यमातून टेकऑफ असा याचा अर्थ होतो. याच्या धावपट्टीवर अरेस्टेड रिकव्हरी तंत्रज्ञानाद्वारे लढाऊ विमानांना लँड करविण्यात येणार आहे.