पुन्हा नव्याने गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कित्तूर चन्नम्मा ते आरटीओ रोडवर बसविण्यात आलेले गतिरोधक हे कुचकामी ठरत आहेत. रबरी गतिरोधक असल्यामुळे काही दिवसांतच ते खराब होतात. त्याचबरोबर त्यांची उंचीदेखील अत्यंत कमी असल्यामुळे या गतिरोधकवरून वाहनचालक वाहने जोरातच चालवत आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रणच नाही. तेव्हा या रस्त्यावर सिमेंट किंवा डांबरीकरणातून गतिरोधकांची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.
कित्तूर चन्नम्मा ते आरटीओ रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, आरटीओ यासह इतर सरकारी कार्यालये आहेत. याचबरोबर शाळा, महाविद्यालयेदेखील असून नेहमीच मोठी वर्दळ असते. मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे ये-जा करणाऱया वाहनांची संख्याही अधिक आहे. परिणामी रस्ता ओलांडताना लहान-मोठे अपघात घडत आहेत. तेव्हा या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, ही मागणी महत्त्वाची आहे.
दरम्यान महत्त्वाचे म्हणजे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला न्यायालये आहेत. मुख्य जिल्हासत्र न्यायालये तसेच रस्त्याच्या दुसऱया बाजूला जेएमएफसी न्यायालय आहेत. त्यामुळे वकिलांना नेहमीच ये-जा करावी लागते. रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला थांबावे लागत आहे. बऱयाचवेळा अचानक जोरदार वाहने चालविली जातात. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. तसेच मोठा अपघात किंवा दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने या परिसरात नवीन गतिरोधक बसवावेत, अशी मागणीही वकीलवर्गातून करण्यात येत आहे.