वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव यांचे मार्गदर्शन
प्रतिनिधी/ बेळगाव
जीवनात बऱ्याच गोष्टी येऊन जातात. काही चांगल्या तर काही वाईटही असतात. मात्र, आपली वास्तू आपल्या सोबत कायम असते. या वास्तुचे प्रवेशद्वार, दिवाणखाना, स्वयंपाकघर, बेडऊम या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मानवी जीवनातल्या प्रत्येक पैलूवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे, असे वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव यांनी सांगितले.
वास्तुशास्त्र एज्युकेशन अॅण्ड रिसर्च फौंडेशनतर्फे शनिवारी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे वास्तुनिर्मिती, शास्तुशास्त्रानुसार रचना या विषयी सविस्तर मार्गदर्शन करताना डॉ. रविराज अहिरराव बोलत होते. प्रारंभी वास्तुविशारद महादेव शिंदे व माजी उपमहापौर सरिता पाटील यांच्या हस्ते डॉ. रविराज अहिरराव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महादेव शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला.
डॉ. अहिरराव यांनी कौटुंबिक जीवनात वास्तुशास्त्राचे महत्त्व विषद केले. वास्तुशास्त्र व्यवस्थित नसल्यास कौटुंबिक जीवनात कशा अडचणी येतात याचे उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण दिले. 8 दिशा आणि 5 तत्वे यांचे संतुलन म्हणजे वास्तुशास्त्र होय. वास्तु 5 तत्वांनी बनलेली असते. शरीरदेखील 5 तत्वांनीच बनलेले आहे. यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांचा समावेश आहे. यांची ऊर्जा लागते आणि हे सांगणारे शास्त्र म्हणजेच वास्तुशास्त्र होय.
भारतीय मूलभूत विज्ञान वास्तुशास्त्र, रचनेचे एक विज्ञान जे मानवी जीवन आणि प्रकृतीदरम्यानचे ध्यान केंद्रित करते. पाच मूलभूत घटक पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश आणि आठ दिशांनी मानवी जीवनावरील प्रभाव सर्व वास्तुशास्त्रात लक्षित केले गेले आहे. चांगले खाणे आणि चांगली जीवनशैली महत्त्वाची आहे. मात्र, काही गोष्टी वास्तुशास्त्रानुसार करणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी शरीरात सकारात्मक कंपने निर्माण करतात. आणि घरातही सकारात्मक कंपने पसरतात. अशा वातावरणामुळे प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी जीवन जगता येते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी वास्तुशास्त्र रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.