25 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट : लागवड झालेल्या वृक्षांचे संवर्धन : नरेगांतर्गत खड्डय़ांची खोदाई
प्रतिनिधी /बेळगाव
सामाजिक वनीकरण विभागामार्फत ग्रामीण भागातील विविध भागांमध्ये रोप लागवडीचे काम सुरू आहे. पावसाला सुरुवात झाल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे विभागाने रोप लागवडीचे काम हाती घेतले आहे. दरवषी मोठय़ाप्रमाणात वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. गतवषी 30 हजार रोपांची लागवड झाली होती. यंदादेखील 25 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट आहे.
यंदा मान्सूनने दडी मारल्याने रोप लागवडीचे काम लांबणीवर पडले होते. मात्र आता अधूनमधून पाऊस होत असल्याने लागवडीला प्रारंभ झाला आहे. राकसकोप, तुरमुरी, बंबरगा, बेनकनहळ्ळी, बिजगर्णी, बेळगुंदी, चलवेनहट्टी, सावगाव आदी भागात लागवड सुरू आहे. विशेषतः रस्त्याच्या दुतर्फा सरकारी जागा, शाळा, ग्राम पंचायत आवार, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खुल्या जागेत ही लागवड केली जात आहे. याचबरोबर गतवषी अतिपाऊस आणि उन्हामुळे नष्ट झालेल्या ठिकाणी देखील रोपे लावली जात आहेत.
वनखाते आणि सामाजिक वनीकरण विभाग वृक्ष लागवड करून झाडांची संख्या वाढविण्यावर भर देत आहे. दरवर्षी लाखो रोपांची लागवड करून संवर्धनासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. लागवड झालेल्या रोपांसभोवती कुंपन आणि उन्हाळय़ाच्या दिवसांत पाणी दिले जात आहे. त्यामुळे लागवड झालेल्या सर्वच वृक्षांचे संवर्धन होत आहे.
वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा रोपे लावली जात आहेत. रोप लागवडीसाठी नरेगा अंतर्गत खड्डय़ांची खोदाई केली जात आहे. त्यामुळे नरेगा कामगारांना देखील काम उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागात वृक्षांची संख्या वाढली आहे. मात्र वनखात्याबरोबर वृक्षांच्या संवर्धनासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.
– प्रशांत जैन (सामाजिक वनीकरण अधिकारी)