ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आ. मुक्ता टिळक यांच्या निधनानंनर रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने माजी नगरसेवक हेमंत रासने यांना तिकीट दिले आहे. त्यावर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शैलेश टिळक म्हणाले, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांची अर्थवट स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही पक्षाकडे तिकीट मागितले होते. घरातील व्यक्तीचं निधन झाल्यानंतर नैसर्गिकपणे कुटुंबियांना उमेदवारी मिळते. त्यामुळे आम्हाला आशा होती. मात्र, पक्षाने वेगळा निर्णय घेतला. पक्षाने घेतलेला निर्णय मान्य आहे. परंतु, मुक्ता टिळक यांच्या कामावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मनात खंत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल चर्चा झाली. उमेदवारी देण्याबाबत अजून काही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दिल्लीतून निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं होतं. ताई गेल्यानंतर घरी यायचं राहिलं होतं. त्यामुळे ते घरी आले होते. मात्र, त्यांनी कोणतंही इंडिकेशन दिलं नव्हतं.
दरम्यान, पक्षाने टिळक कुटुंबियांना तिकिट नाकारून मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय केला, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.