1 जूनपासून लागू होणार नवा नियम : गाम्बिया अन् उझ्बेकिस्तानातील घटनांची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातून विदेशात पाठविण्यात येणाऱ्या सर्व कफ सिरपांची आता लॅब टेस्टिंग होणार आहे. लॅबमध्ये परीक्षण झाल्यावरच सिरपची निर्यात केली जाणार आहे. यासंबंधीचा नवा नियम 1 जूनपासून लागू होणार आहे. मागील वर्षी गाम्बियामध्ये 66 तर उझ्बेकिस्तानात 18 मुलांचा कथित स्वरुपात कफ सिरपच्या सेवनानंतर मृत्यू झाला होता.
डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने (डीजीएफटी) एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार विना परीक्षण आणि प्रमाणपत्राशिवाय कफ सिरपची विदेशात निर्यात करता येणार नाही. भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेबद्दल कुठलीच तडजोड केली जाणार नाही. निर्यातीपूर्वी औषधांचे परीक्षण राज्य सरकारांनी तसेच संबंधित कंपन्यांनी सुनिश्चित करावे असे डीजीएफटीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
फेब्रुवारी महिन्यात तामिळनाडूतील ग्लोबल फार्मा हेल्थकेअरने स्वत:चे सर्व आय ड्रॉप्स परत मागविले होते. तर जागतिक आरोग्य संघटनेने 2022 मध्ये भारतात निर्मित 4 कफ सिरपवरून अलर्ट जारी केला होता.
कफ सिरपच्या परीक्षणासाठी सरकारने काही प्रयोगशाळांची निवड केली आहे. यात भारतीय फार्माकोपिया आयोग, रिजनल ड्रग टेस्टिंग लॅब (आरडीटीएल-चंदीगड), केंद्रीय औषध प्रयोगशाळा (सीडीएल-कोलकाता), पेंद्रीय औषध टेस्टिंग लॅब (सीडीटीएल-चेन्नई, हैदराबाद, मुंबई), आरडीटीएल (गुवाहाटी) आणि एनएबीएल सामील आहे.
1.4 लाख कोटीच्या कफ सिरपची निर्यात
भारताने 2022-23 मध्ये 1.4 लाख कोटीच्या कफ सिरपची निर्यात केली होती. भारत वैद्यकीय उत्पादनांचा प्रमुख उत्पादक तसेच निर्यातदार आहे. तसेच लसींच्या उत्पादनात भारताचेच योगदान सर्वाधिक आहे. जगाला 50 टक्क्यांपेक्षा अधिक जेनरिक औषधांचा पुरवठा भारताकडून होतो. तर अमेरिकेतील सुमारे 40 टक्के जेनेरिक औषधे अन् ब्रिटनमधील सुमारे 25 टक्के जेनरिक औषधे ही भारतात निर्मित असतात. फार्मास्युटिकल जनरेशनप्रकरणी भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या औषध उद्योगात 3 हजार औषध कंपन्या आणि सुमारे 10,500 निर्मिती प्रकल्प सामील आहेत.