समस्या दूर करण्याबाबत केल्या सूचना : पूर ओसरल्यानंतर तातडीने सर्व्हे करून नुकसानभरपाई द्या
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले. यामुळे नदीकाठ, विविध जलाशये तसेच नाल्यांच्या परिसरातील शिवाराला आणि गावाला पुराचा धोका पोहोचला. पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे स्थापन करण्यात आली. त्या निवारा केंद्राची पाहणी न्यायाधीशांच्या कमिटीकडून करण्यात आली आहे. यावेळी पूरग्रस्तांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. चिकोडी तालुक्यातील जनवाड येथे निवारा केंद्र तसेच जनावरांसाठीदेखील निवारा केंद्र आणि चारा बँक सुरू करण्यात आली आहे. त्याठिकाणी उच्च दिवाणी न्यायालयाचे महादेव कनट्टी, न्यायाधीश हरिष रंगनगौडा पाटील, चिकोडीचे सातवे अतिरक्त दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी, न्यायाधीश तृप्ती धराणे यांनी भेट दिली. यावेळी निवारा केंद्रातील पूरग्रस्तांची विचारपूस केली.
न्यायाधीश येणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली होती. निवारा केंद्रामध्ये ज्या त्रुटी होत्या, त्या दूर करण्याबाबत त्यांनी सूचना केली. जनावरांसाठी असलेल्या चाऱ्याचीही पाहणी केली आहे. कृष्णाकाठ, दूधगंगा, वेदगंगा परिसरातील गावांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याची संपूर्ण माहिती न्यायाधीशांनी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाबरोबरच सरकारकडेही पाठपुरावा करण्यात येणार आहे. जनावरांना चारा कमी पडू नये, यासाठी चाऱ्याचा साठा करा, असेही न्यायाधीशांनी सांगितले. नदीकाठावरील पूर ओसरल्यानंतर त्या परिसरात जाऊन पाहणी करावी, धोकादायक घरे असतील तर त्या कुटुंबांना इतरत्र हलवावे. पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी सर्व्हेचे काम करून नुकसानभरपाई देण्यासाठी पाऊल उचला, असेही न्यायाधीशांनी यावेळी सांगितले.