वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांची सोमवारी महत्त्वाची बैठक सरकारच्यावतीने घेण्यात आली होती. ज्यामध्ये बँकांना आगामी काळामध्ये कर्ज वितरणाचा वेग वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सदरची सूचना करण्यात आली.
कोरोना महामारीच्या आधीपासूनच भारतामध्ये बँकांचा कर्ज वितरणाचा वेग हा म्हणावा तितका गतिमान नव्हता. पण आताचे ताजे आकडे पाहिल्यास कर्ज घेण्याच्या प्रमाणामध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. बांधकामसह विविध क्षेत्रातून कर्जाची उचल होताना दिसते आहे. हे सकारात्मक पाऊल पाहता आता बँकांनी कर्ज वितरण प्रक्रियेला वेग देण्याची खऱया अर्थाने गरज आहे. अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी वरील प्रमाणे आवाहन केले आहे.
3 जून 2022 ला संपलेल्या पंधरवडय़ामध्ये बँकांच्या कर्ज वितरणामध्ये 13 टक्क्यांची वाढ दिसली आहे. जी गेल्या तीन वर्षांमध्ये सर्वाधिक आहे. डॉ. कराड म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत बँकांनी कर्ज प्रक्रिया आणखी गतीने राबवायला हवी. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे प्रभावीत झालेल्या क्षेत्रांना आवश्यक वाटल्यास कर्ज देऊन सहकार्य करण्याची भूमिका बँकांनी घ्यायला हवी, असेही डॉ. कराड म्हणाले. बँक प्रमुखांसोबत इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.