कोबी, टोमॅटो वगळता भाजीपाला दरात वाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
वाढत्या उष्म्यामुळे पालेभाज्या आणि गाजर, काकडी आदींना मागणी वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्या आणि गाजर, काकडीचा दर किलोमागे 50 रुपयांच्या पुढे गेला आहे. कोबी, टोमॅटो, कांदापात, शेवग्याच्या शेंगा, नवलकोल वगळता इतर भाजीपाला पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाल्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
शनिवारच्या किरकोळ आठवडी बाजारात कोबी 10 रु., फ्लॉवर 30 रु., ढबू 50 रु. किलो, बिन्स 60 रु. किलो, वांगी 30 रु. किलो, गाजर 40 रु. किलो, टोमॅटो 15 रु. किलो, कारली 60 रु. किलो, भेंडी 60 रु. किलो, गवार 60 रु. किलो, काकडी 40 रु. किलो, दोडकी 60 रु. किलो, बटाटा 30 रु. किलो, कांदे 25 रु. किलो, मेथी 10 रुपयाला एक तर 20 रुपयाला तीन पेंड्या, पालक 10 रु. दोन पेंड्या, कांदापात 20 रु. चार पेंड्या, लालभाजी 10 रु. दोन पेंड्या, शेपू 10 रु. एक पेंडी, कोंथिबीर 10 रु. एक पेंडी, शेवग्याच्या शेंगा 10 रु. एक पेंडी, नवलकोल 10 रु. तीन असा भाजीपाल्याचा दर आहे.
वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हैराण झाले आहेत. त्यातच भाजीपाल्याचा दर वाढू लागल्याने दैनंदिन जीवनात अडचणी येत आहेत. किराणा माल तेल, डाळी, कडधान्य, आदींचे दर गगनाला भिडले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
किरकोळ बाजारात आंबा दाखल
किरकोळ बाजारात आंबा दाखल होऊ लागला आहे. मात्र दर भरमसाठ आहेत. 800 रुपये डझन असा आंब्याचा दर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करणे शक्य नाही.
लिंबूच्या दरात वाढ
वाढत्या उन्हामुळे लिंबूच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे लिंबूचे दर भडकले आहेत. 5 ते 6 रुपयाला एक लिंबू विकला जात आहे. लिंबूसरबत, लिंबू पाणी, लिंबू सोडा याबरोबर स्वयंपाकासाठी लिंबूची मागणी असते, मात्र दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे लिंबू नको म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.