युक्रेनमध्ये युद्धगुन्हे केल्याचा आरोप, चौकशीसाठी अटक आवश्यक
ऍमस्टरडॅम / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. पुतीन यांनी युक्रेनवर युद्ध लादले असून अनेक गंभीर युद्धगुन्हे केले आहेत, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात युक्रेनने तक्रार सादर केली आहे.
रशियाने एक वर्षापपूर्वी युपेनवर हल्ला करुन युद्ध पुकारले आहे. अद्यापही हे युद्ध सुरुच आहे. गेल्या वर्षभरात रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमध्ये घुसून तेथे अनेक अत्याचार केले आहेत. अपहरण, निरपराधी लोकांच्या हत्या, लूटमार आदी अनेक गुन्हे रशियाच्या सैनिकांनी केले असा युक्रेनचा आरोप आहे. मात्र, रशियाकडून सर्व आरोपांचा नेहमीच इन्कार करण्यात आला आहे.
सक्तीच्या स्थलांतराचा आरोप
युक्रेममधील लहान मुले, महिला आणि निरपराध नागरीक यांचे रशियाने अपहणर केले. त्यांना अवैधरित्या त्यांच्या देशातून बाहेर काढून त्यांचे सक्तीने स्थलांतर करण्यात आले. तसेच युक्रेनच्या नागरीकांची अवैधरित्या स्थानांतर रशियात करण्यात आले. हे सर्व कृत्य पुतीन यांच्या सांगण्यावरुनच झाले आहे, असेही अनेक आरोप पुतीन यांच्याविरोधात सादर करण्यात आले आहेत.
इतरांवरही आरोप
रशियाच्या बालअधिकार आयुक्त मारिया ल्होवा-बेलोव्हा यांच्या विरोधातही वॉरंट काढण्यात आले असून त्यांच्यावर बालकांना वाईट वागणूक दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार न्यायालयाच्या प्रासिक्युटरने रशियाच्या युक्रेनमधील कृत्यांसंबंधी नुकतीच चौकशी सुरु केली आहे. रशियाने युक्रेनमध्ये पुतीन यांच्या सांगण्यावरुन जी कृत्ये केली ती तपासण्यासाठी चार वेळा प्रॉसिक्युटरने युपेनला भेटी दिल्या आणि अहवाल तयार केला.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार न्यायालयाच्या कारवाईपूर्व (प्री ट्रायल) न्यायाधीशांनी केलेल्या प्राथमिक परीक्षणात आरोपांमध्ये तथ्य असल्याचे आढळल्याने पुतीन आणि त्यांचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णघ घेण्यात आला अशी माहिती देण्यात आली. त्यामुळेच वॉरंट काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
कारवाईचे अधिकार कितपत
पुतीन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने वॉरंट काढले असले तरी रशियात जाऊन ते लागू करण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाला अधिकार नाही, असे काही आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे. त्यामुळे हे वॉरंट ही केवळ ‘नैतिक’ कारवाई असते. तथापि, असे वॉरंट ज्या राष्टप्रमुखाविरोधात निघते त्याची जगात मानखंडना होते. त्याचे आंतरराष्ट्रीय महत्व कमी होते, असा परिणाम होऊ शकतो.