International Men’s Day-story by sudhakar kashid प्रत्येक घरात एखादा तरी देवाचा किंवा त्या कुटुंबातील आजोबा पणजोबा यांचा फोटो असतोच.कोण रोज त्याची पूजा करतो.कोण सणावाराला हार फुले घालतो.कोण रोज त्यांना वंदन करून आपल्या कामाची सुरुवात करतो.तर एखादा असाही असतो की त्या फोटोकडे क्वचितच कधीतरी बघतो.कोणी त्या फोटोचा उपयोग त्यामागे लाईट व पाण्याची बिले ठेवण्यासाठी करतो काळाच्या ओघात हा फोटो जिर्ण होत जातो.रोज त्या फोटोसमोर उदबत्ती लावल्याने तो काळवंडतो.फुलाच्या वाळलेल्या हारामुळे फोटोलाही हळूहळू भुरा येऊ लागतो.रोज फोटोला गंध हळद कुंकू लावल्याने फोटोही डागाळतो.मग त्या फोटो चे आता काय करायचे हा प्रश्न निर्माण होतो.आणि एके दिवशी हा फोटो भिंतीवरून निघतो.आणि नदी तळ्याच्या काठाला किंवा वडाच्या पिंपळाच्या झाडाखाली येऊन पडतो.जणू काही जुने जीर्ण झाल्यावर देवालाही त्या घरातला आपला मुक्काम हलवावा लागतो.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीचा घाट,लगतच्या पिंपळाच्या झाडाचा दगडी पार,चिखली जवळ प्रयागचा संगम,रंकाळा चौपाटीचा कठडा,कोठी तीर्थाचा काठ,हुतात्मा पार्क,जयंती गोमती नाल्याचा संगम,शिंगणापूरचा घाट ही ठिकाणे या जीर्ण जुन्या देवतांच्या फोटोचा आता आसरा झाली आहेत.रोज हार,फुले,अगरबत्ती, गंध,नमस्कार घालणारे हे फोटो आता एकाकी आहेत.देव आहे की नाही हा वेगळ्या चर्चेचा जरूर मुद्दा आहे.पण देवतांचे प्रतीक असलेले हे असे उघडय़ावर पडणारे फोटो लोकांच्या विचित्र मानसिकतेचे प्रतीक आहे.
या परिस्थितीत एक मात्र खूप चांगले झाले आहे की,कोल्हापुरातील ऋग्वेदा फाउंडेशनच्या (फुलेवाडी) वतीने हे पानवठ्याच्या जागी लोकांनी टाकलेले देवदेवतांचे फोटो गोळा करण्यास सुरुवात केली आहे.अडीच ते साडेतीन हजार फोटो त्यांनी गोळा करून त्याची योग्य त्या पातळीवर निर्गत करण्याची जबाबदारी उचलली आहे.एक खूप चांगला उपक्रम ऋग्वेदाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात राबवला आहे.
देव देवतांचे फोटो हा भावनिक आणि धार्मिक विषय आहे.अनेक देव्हाऱ्या त नव्हे तर बहुतेक घरात देवदेवतांच्या,आजी-आजोबा ,पणजी पणजोबा किंवा घरातील दिवंगत व्यक्तींच्या फोटोच्या रांगा आहेत.जरूर जो तो आपल्या श्रद्धेने त्याची पूजाअर्चा व दैनंदिन देखभाल करतो.अनेक घरात,व्यापारी,उद्योग संस्थात अशा फोटोची रोज पूजा केली जाते.त्या फोटोशी त्या त्या संबंधित व्यक्तीच्या भावना नक्कीच गुंतलेल्या असतात.
पण कालांतराने हे फोटो जीर्ण होतात.अलीकडच्या काळात वास्तुदोष म्हणून घरातील मृत्यू झालेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावू नयेत असलेही “सल्ले” मिळू लागले आहेत.मनाने कुमकुवत असलेले काही लोक त्याचीही अंमलबजावणी करत आहेत.आणि घरातले दिवंगत आई-वडील आजी आजोबा,पणजी, पणजोबा किंवा इतर मृत नातेवाईकांचे फोटो काढून टाकले जात आहेत.आणि या फोटोंचे पुढे काय करायचे म्हणून ते नदी नाले तलावाच्या काठी आणून ठेवले जात आहेत.त्यामुळेच या फोटोच्या वाट्याला दुरावस्था ठरलेली आहे आणि तशीच अवस्था आहे.आजही पंचगंगा नदी रंकाळा तलावाच्या काठावर रोज पाच-सहा फोटो कोणीतरी आणून ठेवतोच अशी परिस्थिती आहे.लोकांच्या मानसिकतेवर जळजळीत प्रकाश झोत टाकणारे हे चित्र आहे.
फक्त एक फोन करा…
देव देवता किंवा घरातील दिवंगत व्यक्तींचे फोटो रस्त्यावर कुठेही टाकू नका.ते आमच्याकडे द्या.आम्ही त्या फोटोसाठी वापरलेल्या कागदाचा लगदा तयार करतो.तो खड्डा काढून पुरतो.किंवा ज्याला त्या लगद्यापासून काही कलाकृती मूर्ती करायची असतील तर त्याला तो लगदा देतो.फोटोची काच प्रेम व्यवसायिकांना मोफत देतो.फोटोची विटंबना होणार नाही यासाठी आम्ही पडलेले फोटो श्रद्धापूर्वक उचलतो.ऋग्वेदा मोरे या माझ्या कन्येच्या अकाली मृत्यूनंतर ऋग्वेदा फाउंडेशन सुरू केले आहे.आणि त्या फाउंडेशन द्वारे हा उपक्रम राबवला जात आहे.त्यामुळे फोटो कुठेही टाकू नका.आम्हाला फक्त एक फोन करा.
ऋग्वेदा मोरे फाऊंडेशन,राजू मोरे