एका विधेयकानंतर भडकली हिंसा ः समाजकंटकांकडून जाळपोळ
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरची राजधानी इंफाळ समवेत अनेक जिल्हय़ांमध्ये 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्याच्या विष्णुपूर जिल्हय़ात विशिष्ट समुदायाच्या लोकांनी जाळपोळ केल्याने तेथे सांप्रदायिक तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याचमुळे राज्य सरकारने इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पुढील दोन महिन्यांसाठी चुराचांदपूर आणि विष्णुपूर येथे कलम 144 लागू केले आहे. राज्य सरकारकडून सादर सहाव्या तसेच सातव्या दुरुस्ती विधेयकाला काही गटांचा विरोध आहे.
तणावपूर्ण भागांमध्ये कायदा-सुव्यवस्था अन् शांतता राखण्यास प्राथमिकता आहे. काही समाजकंटक राज्यात सोशल मीडियाद्वारे द्वेषपूर्ण सामग्री फैलावण्याचा प्रयत्न करत असल्याचे राज्याच्या गृह मंत्रालयाचे विशेष सचिव एच. ज्ञानप्रकाश यांनी म्हटले आहे.
मागील आठवडय़ात मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने मणिपूर (पर्वतीय क्षेत्र) जिल्हा परिषद सहावी तसेच सातवी दुरुस्ती विधेयक सादर केले होते. निदर्शकांनुसार हे विधेयक त्यांच्या मागण्यांच्या अनुरुप नाही. या विधेयकाच्या विरोधात ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर (एटीएसयुएम) अनेक दिवसांपासून निदर्शने करत आहे. या निदर्शनांदरम्यान अनेक वाहनांमध्ये तोडफोड तसेच जाळपोळ करण्यात आली आहे. पोलिसांच्या कारवाईत 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर 5 जणांना अटक करण्यात आली आहे.