विश्वजित राणेंकडून वनखाते काढून घ्या काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषदेतून मागणी
पणजी : जंगलात आग लावून ती नष्ट करण्याचे नियोजनबद्ध कट-कारस्थान रचण्यात आले असून त्यामागचे खरे सत्य शोधून काढण्यासाठी आगीची चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. वनमंत्री विश्वजित राणे आहेत तर त्यांची पत्नी वनमहामंडळाची अध्यक्ष असताना या आगीची चौकशी कोण करणार? हा खरा प्रश्न असून त्यासाठी राणे यांच्याकडून वनखाते काढून घेऊन मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी करावी, असे पक्षाने म्हटले आहे. काँग्रेस पक्ष सरचिटणीस व्हेरीएटो फर्नांडिस, मनिषा उसगांवकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या सावंत सरकारवर आणि मंत्री राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सांगितले की, सत्तरीतील वाघेरीचा डोंगर व इतर ठिकाणचे अनेक डोंगर या आगीत जळून नष्ट झाले असून त्यामागे मोठा घोटाळा दडला आहे. राणे हेच नगरनियोजनमंत्री आहेत. तेव्हा जंगले नष्ट कऊन तेथील जागा बळकावण्याचे नियोजन त्यामागे आहे. सत्तरीतील अनेक डोंगरांवर रस्ते कसे झाले? मशिनरी कशी पोहोचली? याची उत्तरे राणे यांनी द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जमिनी ताब्यात घेण्यासाठीचे कारस्थान
जंगलात आग लावायची आणि झाडे-झुडपे नष्ट झाली की तेथील जमिनीचे ऊपांतर कऊन ती ताब्यात घ्यायची असे हे कारस्थान आहे. गोमंतकीय जनतेने वेळीच सावध होऊन हे कारस्थान हाणून पाडले पाहिजे, असे आवाहन फर्नांडिस आणि उसगांवकर यांनी केले.
डोंगर, जंगलात जाण्यास बंदी चुकीची
या आगीमुळे गोव्याची नैसर्गिक संपदा नष्ट झाली असून अनेक डोंगर उघडे-बोडके झाले आहेत. आता जंगलात जाणाऱ्यांवर राणेंनी बंदी घातली आहे. म्हणजे डोंगरात, जंगलात वाटेल ते करायला राणे मोकळे आहेत. त्यामुळे तेथे काय चालते ते लोकांना कळणारच नाही. अशी बंदी घालणे चुकीचे असून इतकी वर्षे या आगी का लागल्या नाहीत? असा प्रश्न काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे. या आगी विझविण्यासाठी सरकारने तातडीने काहीच उपाय केले नाहीत. ही आपत्ती मानवनिर्मित असून मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तसेच वनखाते राणेंकडून काढून घ्यावे, असेही काँग्रेस पक्षाने सूचवले आहे.