अरविंद दळवाई यांची पत्रकार परिषदेत मागणी
बेळगाव : घटप्रभा साखर कारखान्यामध्ये सुमारे 200 कोटींचा गैरव्यवहार झाला असून, बेकायदेशीररित्या हा कारखाना चालविण्यासाठी एक को-ऑप. सोसायटीकडे देण्यात आला आहे. आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचा या गैरप्रकारात सहभाग असून, सरकारने याची संपूर्ण चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी अरविंद दळवाई, गुंडाप्पा कमते यांनी सर्किट हाऊस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी घटप्रभा साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली. 1992 पर्यंत कारखाना सुस्थितीत होता. कारखान्यावर कोणतेही कर्ज नव्हते. मात्र त्यानंतर भालचंद्र जारकीहोळी यांनी कारखाना ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे. विविध विकासकामे करतो म्हणून बँकांकडून 160 कोटी रुपयाचे कर्ज घेतले. मात्र कोणत्याही प्रकारचे इतर उत्पादन कारखान्याने आतापर्यंत घेतलेच नाही. हे कर्ज वाढत गेल्यामुळे शेवटी हा साखर कारखाना अरिहंत सोसायटीकडे चालविण्यासाठी दिला गेला.
कारखाना देताना 40 कोटी कर्जदेखील घेतले आहे. या प्रकारामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेअरधारकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही. कारखान्याने वार्षिक सभा घेऊन सभासदांना काहीच माहिती दिली नाही. कर्ज घेताना बोगस कागदपत्रे तयार केल्याचा आरोपही अरविंद दळवाई यांनी केला आहे. आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्यामुळे शेतकरी आणि कारखान्यातील कामगार अडचणीत आले आहेत. तेव्हा सरकारने या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारखान्याच्या संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. यावेळी सुलतानसाब मुलताने यांच्यासह इतर उपस्थित होते.