पुलाची शिरोली / वार्ताहर
मुंबई क्राईम ब्रॅंचच्या पथकांकडून रविवारी सायंकाळी पुलाची शिरोलीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दिलेल्या पाठींबा प्रतिज्ञा पञांची चौकशी करण्यात आली.
शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यामुळे खरी शिवसेना कोणाची आहे. हे ठरविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या दोघांच्या गटाकडून पाठींबा प्रतिज्ञा पञे गोळा करण्यासाठी संपूर्ण राज्यात जणू स्पर्धाच सुरू झाली होती. यामध्ये बोगस प्रतिज्ञापञे दाखल करण्यात आली आहेत. त्याची चौकशी करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली होती.
त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात व ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मुंबई क्राईम ब्रॅंचच्या पथकांकडून चौकशी केली जात आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता हे पथक पुलाची शिरोली ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले. त्यांनी प्रतिज्ञा पञावरील नावानुसार शिवसैनिकांना बोलावून खाञी करुन घेतली. यामध्ये नाव, ओळखपत्र, सही आदींचा समावेश होता. त्यानंतर त्यांच्याकडून सहमती असल्याचे जबाब नोंदवून सह्या करून घेण्यात आल्या. यावेळी मुंबई क्राईम ब्रॅंचचे पोलिस पथक गावात आल्यामुळे ग्रामस्थांच्यातून दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हा प्रमुख सातापा भवान, तालुका प्रमुख बाजीराव पाटील, शहर प्रमुख राजकुमार पाटील यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.