वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची सीबीआयकडून दिल्ली येथील मुख्यालयात सखोल चौकशी करण्यात आली आहे. ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांनी काही फायलींवर निर्णय घेण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच त्यांना देऊ करण्यात आली होती, असा आरोप आहे.
सत्यपाल मलिक मेघालयसह अनेक राज्यांचे राज्यपाल राहिलेले आहेत. वादग्रस्त विधाने करण्याबाबत ते प्रसिद्ध असून नेहमी प्रकाशझोतात असतात. नव्या कृषी कायद्यांविरोधात वर्षभर झालेले शेतकरी आंदोलनाच्या काळात त्यांनी केंद्र सरकारची कोंडी करणारी विधाने अनेकवेळेला केलेली होती.
शुक्रवारी त्यांना दिल्लीला बोलावून घेऊन सीबीआयच्या मुख्यालयात त्यांची साडेतीन तास चौकशी करण्यात आली. गेल्या वषीच्या 17 ऑक्टोबरला राजस्थानमध्ये केलेल्या एका भाषणामध्ये त्यांनी स्वतःच आपल्याला एक फाईल क्लिअर करण्यासाठी 150 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असे स्पष्ट केले होते. तेव्हापासून ते वादाच्या भोवऱयात असून चौकशी सुरू आहे. आपण स्वतःच पंतप्रधानांना आपल्याला लाच देऊ केल्याची माहिती दिली होती, असाही दावा मलिक यांनी त्या भाषणात केला होता. आपल्या कार्यकाळात काश्मीरमधील भ्रष्टाचार रोखण्यात यश मिळाले होते, असेही प्रतिपादन त्यांनी केले होते. 3 ऑक्टोबरला मलिक यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर त्वरित त्यांना चौकशीसाठी दिल्लीला पाचारण करण्यात आले होते.