वृत्तसंस्था/ राजकोट
2022-23 क्रिकेट हंगामामध्ये इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान राजकोटमध्ये खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत शेष भारत आणि विद्यमान रणजी करंडक विजेता मध्यप्रदेश यांच्यात हा सामना होणार आहे.
कोरोना महामारी समस्येनंतर तीन वर्षांच्या कालावधीत खंडित झालेल्या या स्पर्धेचे पुनरागमन होत आहे. 2019-20 सालात रणजी करंडक विजेता सौराष्ट्र या सामन्याचे यजमानपद भूषवित आहे. सौराष्ट्र संघाने 2020 च्या मार्चमध्ये रणजी करंडक पटकावताना अंतिम सामन्यात बंगालचा पहिल्या डावातील घेतलेल्या आघाडीवर पराभव केला होता. या घटनेनंतर आठवडाभराचा कालावधी उलटला आणि संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीला प्रारंभ झाला होता.
या महामारीमुळे भारतातील क्रीडा स्पर्धेवरही विपरित परिणाम झाला. अनेक स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. 2020-21 क्रिकेट हंगामात रणजी क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली होती. भारतामध्ये सर्वात जुनी ओळखली जाणारी रणजी क्रिकेट स्पर्धा पुन्हा 2021-22 हंगामात खेळविली गेली आणि मध्यप्रदेशने गेल्या जूनमध्ये अंतिम सामन्यात मुंबईचा 6 गडय़ांनी पराभव करून विजेतेपद मिळविले होते. इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा यापूर्वी 2019 फेब्रुवारीमध्ये खेळविली गेली होती.
तत्कालीन रणजी विजेत्या विदर्भ संघाने शेष भारत संघाचा नागपूरमध्ये झालेल्या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीवर पराभव करत विजेतेपद पटकाविले होते. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने 2022 इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद स्वीकारण्याची विनंती सौराष्ट्र क्रिकेट संघटनेला केली होती आणि सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने या विनंतीला मान देऊन या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले आहे.