सौराष्ट्रविरुद्ध 8 गडी राखून एकतर्फी विजय, कुलदीप सेनचे सामन्यात 8 बळी,
राजकोट / वृत्तसंस्था
कुलदीप सेनने सौराष्ट्राचे शेवटचे 2 फलंदाज स्वस्तात गारद करत सामन्यात 8 बळी नोंदवल्यानंतर शेष भारत संघाने 8 गडी राखून सहज विजय संपादन केला आणि 29 व्यांदा इराणी चषक जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. या लढतीत सौराष्ट्राचा पहिला डाव 98 धावांमध्ये गारद झाल्यानंतर शेष भारत संघाने पहिल्या डावात 374 धावांचा डोंगर रचला. त्यानंतर सौराष्ट्राने दुसऱया डावात सर्वबाद 380 धावा केल्यानंतरही शेष भारतसमोर दुसऱया डावात दोन दिवसात अवघ्या 105 धावांचे किरकोळ टार्गेट होते आणि ते त्यांनी 31.2 षटकात 2 गडय़ांच्या बदल्यात पार केले.
विजयासाठी 105 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना अभिमन्यू ईश्वरनने नाबाद 63 धावा केल्या आणि यष्टीरक्षक-फलंदाज केएस भरत (नाबाद 27) याच्यासह तिसऱया गडय़ासाठी 81 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.
तत्पूर्वी, युवा कुलदीप सेनने (19 षटकात 5-94) दिवसाच्या पहिल्या टप्प्यात पार्थ भूतला वेगवान चेंडूवर पायचीत केले. 89 धावांची दमदार खेळी साकारणाऱया जयदेव उनादकटला देखील कुलदीपनेच तंबूचा रस्ता दाखवला. सामन्यात 8 बळी घेणाऱया कुलदीप सेनने टी-20 वर्ल्डकपसाठी आपल्याला नेट बॉलर म्हणून का निवडले गेले आहे, याचाच जणू येथे दाखला दिला.
मागील 20 सामन्यात जेमतेम 32 धावांची सरासरी नोंदवणाऱया ईश्वरनने येथे काही दमदार कव्हरड्राईव्ह लगावले. पण, त्यावेळी त्याच्यावर सर्फराज खानप्रमाणे दडपणाची स्थिती नव्हती. शेष भारतचा पहिला डाव 3 बाद 18 असा गडगडला असताना सर्फराजने खेळपट्टीवर संयम व आक्रमणाचा उत्तम मिलाफ साधण्यावर भर दिला होता.
या सामन्याच्या पहिल्या दिवशी सौराष्ट्राचे 4 बळी अतिशय स्वस्तात गारद करत त्यांचा डाव अवघ्या 98 धावांवर खुर्दा करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱया मुकेश कुमारला अपेक्षेप्रमाणे सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मुकेशने पहिल्या डावात 23 धावात 4 बळी, असा लक्षवेधी मारा केला होता.
शेष भारत संघाचा कर्णधार हनुमा विहारीने पहिल्या डावातील शतकवीर सर्फराजच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. ‘गोलंदाजांना अनुकूल स्थिती असताना देखील सर्फराजने उत्तम फलंदाजी साकारली. आमची 220 धावांची भागीदारी महत्त्वाची होती’ असे विहारी याप्रसंगी म्हणाला. पहिल्या डावात विहारीने 184 चेंडूंचा सामना करत संयमी 82 धावांचे योगदान दिले तर सर्फराजने 178 चेंडूत 138 धावा फटकावल्या होत्या.
सौराष्ट्र संघाचा कर्णधार उनादकटने पहिल्या दिवशी खेळपट्टी कठीण असल्याचा आपल्याला फटका बसला असल्याचे निरीक्षण नोंदवले. ‘राजकोटची खेळपट्टी नेहमीप्रमाणे अजिबात नव्हती. आमचे अंदाज यामुळे चुकत गेले’, असे त्याने येथे सांगितले.
संक्षिप्त धावफलक
सौराष्ट्र पहिला डाव ः सर्वबाद 98. शेष भारत पहिला डाव ः सर्वबाद 374, सौराष्ट्र दुसरा डाव ः सर्वबाद 380 (जयदेव उनादकट 89, प्रेरक मंकड 72, शेल्डॉन जॅक्सन 71. कुलदीप सेन 5-94, सौरभ कुमार 3-80, मुकेश कुमार, जयंत यादव प्रत्येकी 1 बळी). शेष भारत दुसरा डाव (टार्गेट 105) ः 31.2 षटकात 2 बाद 105 (अभिमन्यू ईश्वरन 78 चेंडूत 9 चौकारांसह 63, केएस भरत 82 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 27. जयदेव उनादकट 11 षटकात 2-37).