भारताची 7 गडी राखून मात, 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी सलामी
मॅलाहिदे / वृत्तसंस्था
पावसाने व्यत्यय आलेल्या येथील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय संपादन केला असला तरी यजमान आयर्लंड संघाने पुरेपूर झुंज देत रंग भरण्याचा प्रयत्न केला. रविवारी उशिराने खेळवल्या गेलेल्या या लढतीत आयरिश संघाने निर्धारित 12 षटकात 4 बाद 108 धावा केल्या तर प्रत्युत्तरात भारताने 9.2 षटकात 3 बाद 111 धावांसह विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 12 षटकांचा खेळवण्यात आला.
प्रारंभी, हॅरी टेक्टरच्या 33 चेंडूतील नाबाद 64 धावांच्या आक्रमक खेळीच्या बळावर आयर्लंडला 4 बाद 108 धावांची मजल मारता आली. त्याच्या खेळीत 6 चौकार, 3 षटकारांचा समावेश राहिला. प्रत्युत्तरात इशान किशन (11 चेंडूत 26), दीपक हुडा (29 चेंडूत नाबाद 47) व कर्णधार हार्दिक पंडय़ा (12 चेंडूत 24) यांच्या फटकेबाजीमुळे भारताने 9.2 षटकात सहज विजय संपादन केला.
किशनने आपला बहारदार फॉर्म या लढतीतही कायम राखत फटकेबाजी सुरु केली आणि यामुळे भारताला पहिल्याच षटकात 15 धावांचा फ्लाईंग स्टार्ट लाभला. जोशुआ लिटलच्या गोलंदाजीवर त्याने दोन-एक चौकार व 1 षटकार वसूल केले. आश्चर्याची बाब म्हणजे ऋतुराज गायकवाडच्या जागेवर दीपक हुडा सलामीला बढतीवर आला आणि त्याने प्रारंभापासूनच आक्रमक पवित्र्यावर भर दिला. त्याने कर्णधार हार्दिक पंडय़ासह 64 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी देखील साकारली.
भारत सहज जिंकणार, असे संकेत असताना क्रेग यंगने किशन व सूर्यकुमार यादव (0) यांना लागोपाठ चेंडूंवर बाद करत सामन्यात जान आणण्याचा प्रयत्न केला. किशन उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला. दुखापतीतून सावरत संघात परतलेल्या सूर्यकुमारला पहिल्याच चेंडूवर पायचीत होत परतावे लागले. त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न सपशेल फसल्यानंतर चेंडू थेट पॅडवर आदळला. सूर्यकुमारने रिव्हय़ू घेतला. पण, बॅटची कड लागली नसल्याचे व चेंडू यष्टीच्या रोखाने असल्याचे रिप्लेत स्पष्ट झाले.
त्यानंतर हार्दिक व हुडा मात्र आयरिश गोलंदाजांवर जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडले. अँडी मॅकब्रिनच्या एकाच षटकात 21 धावांची आतषबाजी केल्यानंतर हा सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकला. हार्दिकच्या खेळीत 3 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. हुडाने अखेरपर्यंत क्रीझवर टिकून राहत विजयी चौकारासह सामन्याची सांगता केली. त्याच्या खेळीत 2 षटकार व अर्धा डझन चौकारांचा समावेश राहिला.
हॅरी टेक्टरचे अर्धशतक
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर ढगाळ हवामानाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तब्बल 2 तास 20 मिनिटांचा खेळ वाया गेला असल्याने प्रत्येकी 8 षटकांची कपात करण्यात आली. भुवनेश्वर व हार्दिक पंडय़ा यांची गोलंदाजी उत्तम राहिली. पंडय़ा दुसऱयाच षटकात ऍटॅकवर आला आणि त्याने धोकादायक पॉल स्टर्लिंगला तंबूचा रस्ता दाखवला. स्टर्लिंगचा पहिला चेंडू कव्हरकडे पिटाळल्यानंतर दुसऱया चेंडूवरही तसाच प्रयत्न फसला आणि मिडऑफवर तैनात हुडाने सोपा झेल घेतला. त्यानंतर अवेश खानने त्याच्या पहिल्या षटकात गॅरेथ डेलॅनीला यष्टीमागे झेल देणे भाग पाडले.
लॉर्कन टकरने 16 चेंडूत 18 धावा केल्या. त्यानंतर डावाच्या उत्तरार्धात हॅरी टेक्टरने जोरदार फटकेबाजी करत 33 चेंडूत नाबाद 64 धावांचे योगदान दिले. त्याच्या खेळीत 6 चौकार व 3 षटकारांचा समावेश राहिला. टेक्टरने अवेशच्या फुलटॉसवर डीप कव्हरकडे उत्तुंग षटकार खेचला आणि त्यानंतर रिव्हर्स हिटवर चौकार वसूल केला. त्याच्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला शेवटच्या षटकात 17 धावा वसूल करता आल्या.
संक्षिप्त धावफलक
आयर्लंड ः 12 षटकात 4 बाद 108 (हॅरी टेक्टर 33 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 64, लॉर्कन टकर 16 चेंडूत 2 षटकारांसह 18. अवांतर 10. भुवनेश्वर कुमार 3 षटकात 1-16, हार्दिक पंडय़ा 1-26, अवेश खान 1-22).
भारत ः 9.2 षटकात 3 बाद 111 (दीपक हुडा 29 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 47, इशान किशन 11 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 26, हार्दिक पंडय़ा 12 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह 24, दिनेश कार्तिक 4 चेंडूत नाबाद 5. अवांतर 9. क्रेग यंग 2 षटकात 2-18, जोश लिटल 2.2 षटकात 1-39).
भारतासारख्या अव्वल संघाविरुद्ध लढताना कोणत्याच आघाडीवर कमी पडून चालत नाही. पण, तरीही आमच्या संघाने जिगरबाज लढत दिली, त्याचा मला अभिमान वाटतो. विशेषतः हॅरी टेक्टरची आक्रमक फलंदाजी लक्षवेधी स्वरुपाची होती. आता दुसऱया लढतीतही संघर्षमय खेळ साकारण्यावरच आमचा भर असेल.
-आयरिश कर्णधार ऍन्ड्रय़ू बॅल्बिर्नी
ऋतुराज गायकवाडला पोटरीच्या वेदना जाणवत होत्या आणि त्यामुळे आम्ही त्याला खेळवण्याचा धोका पत्करणे टाळले. माझ्या दृष्टीने खेळाडूचे पूर्ण तंदुरुस्त असणे अधिक महत्त्वाचे आहे. तो खेळणार नसल्याने आम्ही सर्वांनी एका स्थानाने वर फलंदाजी करण्याला प्राधान्य दिले.
-भारतीय टी-20 कर्णधार हार्दिक पंडय़ा
कर्णधार हार्दिक पंडय़ाने मला कोणत्या टप्प्यावर मारा करायचा, याबद्दल पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पण, तरीही येथील कमालीच्या थंड वातावरणाशी जुळवून घेणे अतिशय आव्हानात्मक होते. या लढतीत मला तीन स्वेटर घालून उतरावे लागले आणि तरीही थंडी जाणवत होती.
-भारतीय फिरकीपटू यजुवेंद्र चहल
भुवनेश्वरचा टी-20 पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम
भारताचा आघाडीचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने टी-20 क्रिकेट इतिहासातील पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक 34 बळींचा नवा विक्रम नोंदवला. भुवीने यादरम्यान विंडीजचा माजी फिरकीपटू सॅम्युएल बद्री व न्यूझीलंडचा पेसर टीम साऊदी यांचा पॉवर-प्लेमध्ये 33 बळींचा विक्रम मागे टाकला. त्याचे या सामन्यातील पृथक्करण 3 षटकात 16 धावात 1 बळी, असे राहिले.
उभय संघातील दुसरी व शेवटची टी-20 आज
दोन्ही संघ आज (मंगळवार दि. 28) आज दुसऱया व शेवटच्या टी-20 लढतीसाठी मैदानात उतरतील, त्यावेळी निरभ्र हवामान अपेक्षित असणार आहे. याशिवाय, भारतासाठी उमरान मलिकसारख्या युवा खेळाडूंना सूर लाभणे महत्त्वाचे ठरेल. रविवारी ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे फलंदाजीला उतरला नाही. आजही तो उपलब्ध नसल्यास मागील संघ कायम ठेवला जाण्याची शक्यता असेल. दुखापतीतून सावरत संघात परतलेल्या सूर्यकुमारला पहिल्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होत परतावे लागले. आता तो देखील याची भरपाई करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.