विजेअभावी दैनंदिन व्यवहार ठप्प : हेस्कॉमच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष: नागरिकांची मोठय़ाप्रमाणात गैरसोय
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-कणकुबी विभागात गेल्या पंधरा दिवसापासून अनियमित वीजपुरवठा होत आहे. विजेअभावी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार दिवसापासून जांबोटी-कणकुंबी परिसरात वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. याकडे हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल होत आहेत.
जांबोटी-कणकुंबी भागातील सुमारे 40 पेक्षा जास्त गावांना मच्छे (बेळगाव) येथील उपवीज वितरण केंद्रातून विजेचा पुरवठा करण्यात येतो. मात्र या भागात उपवीज वितरण केंद्राची सुविधा नसल्यामुळे थेट वीज वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा होत असल्यामुळे या भागातील वीजपुरवठय़ात अनेक तांत्रिक बिघाड उद्भवत असल्यामुळे वीजपुरवठय़ामध्ये व्यत्यय निर्माण होतो. त्यातच या भागातील वीजवाहिन्या जंगल भागातून गेल्या असल्यामुळे पावसाळा असो की उन्हाळा वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या तुटून पडणे तसेच वृक्ष उन्मळून पडणे यासारख्या कारणांमुळे वीजपुरवठा सतत गायब होत असतो. त्यामुळे गंभीर समस्या उद्भवत आहेत.
अपुऱया कर्मचारी वर्गामुळे गैरसोय
सध्या या भागात पाऊस होत असल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. दिवसातून केवळ तीन ते चार तासच वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. तसेच विजेअभावी नळपाणी पुरवठा योजना देखील ठप्प होत असल्यामुळे या भागात अनेक गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच दळण, कांडप व विजेवर चालणारे इतर व्यवसायदेखील ठप्प होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. जांबोटी, कणकुंबी विभागासाठी हेस्कॉमने केवळ तीनच लाईनमनची नियुक्ती केली असल्यामुळे अपुऱया कर्मचारी वर्गामुळे देखील या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
तरी खानापूर उपविभाग हेस्कॉमच्या वरि÷ अधिकाऱयांनी लक्ष घालून जांबोटी भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
अन्यथा आंदोलनाचा इशारा
जांबोटी-कणकुंबी परिसरात गेल्या वर्षभरापासून वीजपुरवठा सुरळीत होत नसून काहीवेळा आठ-आठ दिवस वीजपुरवठा खंडित होतो. याबाबत अर्जविनंत्या करूनदेखील हेस्कॉमचे अधिकारी वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या आठवडय़ापासून पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला आहे. मागील चार दिवसांपासून या भागातील वीजपुरवठा गायब आहे. याबाबत हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी कोणतीच दखल घेतली नाही. यासाठी येत्या आठ दिवसात या भागाचा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास खानापूर हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या भागातील समिती कार्यकर्ते किरण गावडे यांनी दिला आहे.
-किरण गावडे