सध्या एका महत्त्वाच्या वृत्ताने अनेकांच्या विशेषतः निसर्गप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सर्व काही सुखरुप पार पडले तर भारतात 70 वर्षात प्रथमच एक अशी घटना घडणार आहे की ज्यामुळे ऐतिहासिक स्मृती जाग्या होतील. ही घटना आहे एका चित्तीणीच्या गर्भारपणाची. काही दिवसांपूर्वी आफ्रिकेतील नामिबिया या देशातील काही चित्ते मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आले. त्यांच्यापैकी आशा नामक चित्तीण गर्भवती असल्याचे अनुमान वनाधिकाऱयांनी काढले आहे. या चित्तीणीवर लक्ष ठेवण्यात येत असून वनाधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार तिची प्रकृती उत्तम आहे. तिला भारतात आणण्यापूर्वीच ती गर्भवती असावी, असेही वनाधिकाऱयांचे म्हणणे आहे. हे अनुमान खरे निघाले तर भारतात सात दशकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच वनामध्ये मुक्त वातावरणात चित्त्याचा जन्म होणार आहे. आता या चित्तीणीची काळजी घेण्यासाठी कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे बाळंतपण सुखरुप पार पडले तर ती भारतासाठी जमेची बाजू असेल, असे अनेक वन्यप्राणी तज्ञांनीही अभ्यासाअंती स्पष्ट केले आहे.
अभयारण्ये किंवा संरक्षित जागांमध्ये चित्त्यांच्या पिल्लांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असते असे आढळून आले आहे. कारण अभयारण्यांचे क्षेत्रफळ मर्यादित असते आणि कमी जागेत वेगवेगळय़ा प्रकारचे जास्त प्राणी सामावलेले असतात. त्यात चित्त्यांच्या पिल्लांची शिकार करणारे बिबटय़ा, कोल्हे, जंगली कुत्रे, तरस, लांडगे इत्यादी प्राणीही असतात. त्यांच्यापासून आपल्या पिल्लांचे संरक्षण करणे चित्तीणीला बऱयाचवेळा शक्य होत नाही. त्यामुळे अशा वातावरणात चित्त्यांच्या पिल्लांचा मृत्यूदर 90 टक्क्याहून अधिक असतो. त्यामुळे अशा या चित्तीणीचे केवळ बाळंतपण सुखरुप होऊन चालणार नाही तर झालेली पिल्ले किमान दोन वर्षांपर्यंत जगणे आवश्यक आहे. तर भारतात चित्त्यांची संख्या वाढण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असे म्हणता येईल. तसेच हे चित्ता अभियान यशस्वी झाले, असेही सांगता येईल असे वन्यप्राणी तज्ञांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.