कोरोना रुग्णसंख्येच्या सध्या दोन बाजू ठसठशीत दिसून येत आहेत. एका बाजूला रुग्णसंख्या वाढत आहे, तर दुसऱया बाजूला याच रुग्णात लक्षणरहितांची संख्या अधिक असणे, रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांची संख्या कमी असणे किंवा रुग्ण गंभीर अवस्थेत नसणे. या दोन्ही बाजू पडताळणी करुनच पालिका अधिकारी तसेच कोरोना तज्ञ गंभीर धोका नसल्याचे सांगत आहेत. मात्र त्याचवेळी सावध राहण्याचा इशारादेखील देण्यास ते विसरत नाहीत.
मे महिन्याचा पहिला पंधरवडा सरत असताना या कालावधीतील एकूण रुग्णसंख्या पाहिल्यास संपूर्ण एप्रिल महिन्याच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत 90 टक्क्यांनी वाढ असल्याचे दिसून येत आहे. मग खरच कोरोना वाढतोय का असा सवाल उपस्थित होतो. मात्र मुंबई महानगरपालिकेचे चोखंदळ नियोजन आणि गंभीर धोका नसल्याचे कोरोना तज्ञांचे आश्वासन बऱयाच अंशी धीर देऊन जाते. तरीही मुंबईकरांची कोविड प्रति असणारी जबाबदारी वारंवार अधोरेखित होत आहे.
1 एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 32 एवढे रूग्ण आढळले. तर 15 एप्रिल 44 एवढे रूग्ण आढळले. म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात रुग्णसंख्या दोन अंकातच होती. तर 28 एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 90 एवढे रूग्ण आढळले. तेव्हापासून रुग्ण एक दोन अंकांनी वाढत जाऊन शंभरी गाठू लागली. आगामी दहा दिवसात शंभरी ओलांडून दिडशेच्या घरात ही संख्या येऊन ठेपली आहे. मागच्या मंगळवारपासून 122 ते 151 च्या संख्येत मुंबईत रुग्ण आढळून येत आहेत. मे महिन्याचा पहिला पंधरवडा सरत असताना या कालावधीतील एकूण रुग्णसंख्या पाहिल्यास संपूर्ण एप्रिल महिन्याच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत 90 टक्क्यांनी वाढत असल्याचे समोर येत आहे. ही झाली प्रत्यक्ष रुग्णांची संख्यावारी. 1 एप्रिल रोजी मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 250 एवढी होती. सध्या ती 898 वर पोहचली आहे. म्हणजे सक्रिय रुग्णसंख्येतही चौपट वाढ दिसून येते. यातूनच कोरोना वाढतोय अशी शंका येत आहे. मात्र या शंकेचे निरसन पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांकडून केले जात आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी देखील लाट किंवा नवा वेरियंट आढळत नसल्याने भीती कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्या आढळणाऱया बाधितांमधील रुग्ण लक्षणविरहित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने कोविडचा प्रभाव नसल्यासारखा आहे. शिवाय मुंबईतील कोरोना मृत्यू शून्य गणला जात असल्याने पालिका अधिकाऱयांच्या आश्वासनावर मुंबईकर निर्धास्त आहेत. एप्रिलच्या दुसऱया पंधरवडय़ानंतर मुंबईतील रुग्णसंख्या किंचित वाढत असल्याचे अधिकारी देखील कबुल करत आहेत. एप्रिल अखेर रुग्णसंख्येत सुमारे 50 टक्क्यांनी वाढ होऊन दैनंदिन रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली. तोपर्यंत मे महिना आला. मात्र अचानक होणाऱया रुग्णवाढीकडे दुर्लक्ष झाले नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. यातही सध्या सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. गुढी पाडव्यापासून मास्कही ऐच्छिक करण्यात आला. मात्र गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असा सल्ला टास्क फोर्स सदस्य सतत देत आहेत. मास्क वापरत नसताना तसेच निर्बंध शिथिल झाले असताना प्रवासातील, बाजारातील सार्वजनिक ठिकाणावरील मुंबईकरांचा वावर खुपच मोकळा झाला आहे. अशावेळी एखादी बाधित व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येण्याची भीती मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे संशयित व्यक्तीला शोधणे यंत्रणेसमोर आव्हान आहे. यासाठी चाचण्यांवर अधिक भर दिला जात असल्याचे अधिकारी वर्ग सांगतो. रुग्णसंख्या वाढत जाणाऱया कारणांमागे समूह संसर्गाचे कारणही अधिकारी वर्ग खोडून काढताना दिसतो. कारण सध्या दिडशेच्या संख्येत आढळणारे रुग्ण हे विविध ठिकाणांवरील असून एकाच ठिकाणी अनेक रुग्ण आढळत नाहीत. किंवा सोसायटय़ा वस्त्यांमध्ये देखील एकाच वेळी अनेक रुग्ण बाधित असल्याचे आढळत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेतील विविध वॉर्डात वेगवेगळ्या दिवशी रुग्ण आढळत असल्याने समूह संसर्ग नसल्याची बाब सिद्ध होत आहे. किंबहुना रुग्ण संख्या वाढत असल्यामागील कारणमीमांसा अद्याप स्पष्ट होत नसल्याचे अधिकाऱयांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोविड वर्तणुकीचे पालन अजूनही कायम ठेवावे असा सल्ला देण्यात येत आहे. मात्र या रुग्णवाढीचे वॉर्ड निहाय निरीक्षण केले असता कोरोनाच्या पहिल्या, दुसऱया लाटेत जे वॉर्ड अधिक रुग्णसंख्येसाठी गणले जात होते, अशाच वॉर्डमध्ये अजूनही रुग्ण संख्या आढळत असल्याचे दिसून येते. कोरोनाच्या पहिल्या तसेच दुसऱया लाटेत पालिका क्षेत्रातील के पश्चिम वॉर्डात सर्वाधिक रुग्ण आढळत होते. आजही याच परिसरात म्हणजे अंधेरी पश्चिमेला रुग्ण आढळत आहेत. या सोबत वांद्रे पश्चिम, आर दक्षिण, एफ उत्तर या भागांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई पालिका क्षेत्रांसह एमएमआर परिसरातील अभ्यासदेखील सुरु आहे. मुंबईला लागून असलेल्या एमएमआर परिसरातील सर्वाधिक कर्मचारी मुंबईला दैनंदिन भेट देत असतात. रविवारी मुंबई महापालिका क्षेत्रातील 151 रुग्ण धरुन एमएमआर परिसर म्हणजे पनवेल, रायगड, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हास नगर, वसई विरार, पालघर अशा सर्व मिळून 191 रुग्ण आढळले. मुंबईची रुग्णवाढीतील स्थिती अशी असताना राज्यातही सुक्ष्म रुग्ण वाढ आढळून येत आहे.
सुक्ष्म वाढीवर सर्वेक्षणाची मात्रा ः राज्यासह मुंबईत सुरु असलेली सुक्ष्म रुग्णवाढ रोखण्यासाठी सर्वेक्षणावर भर दिला जात आहे. यात चाचण्या, लसीकरण आणि कोविड वर्तणूकीचे महत्व सांगितले जात आहे. सार्वजनिक रुग्णालये खुली झाली असली तरी देखील संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या जात आहेत. यात ताप आणि श्वसन विकारी रुग्णांची कोविड चाचणी करण्यात येते. चाचण्या विलगीकरण यासह लसीकरणावर भर दिला जात आहे.
राम खांदारे