कंत्राटदाराकडे 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप भोवण्याची चिन्हे
प्रतिनिधी/ बेंगळूर
हिंडलग्यातील कंत्राटदार संतोष पाटील यांची आत्महत्या आणि 40 टक्के कमिशनच्या आरोपामुळे हायकमांडच्या सूचनेवरून ग्रामविकास व पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. संतोष पाटील यांच्या आत्महत्येला ईश्वरप्पाच कारणीभूत आहेत, असा आरोप करून काँग्रेस नेत्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. दरम्यान, भाजपश्रे÷ाrंनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आहे.
परिणामी ईश्वरप्पांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना ईश्वरप्पा यांचा राजीनामा घेण्याची सक्त सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर ईश्वरप्पांनी गुरुवारी सायंकाळी शिमोग्यात तातडीने पत्रकार परिषद घेवून राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तसेच विधानसभेच्या पूर्व प्रवेशद्वारावर अहोरात्र धरणे आंदोलन सुरू केले. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे ईश्वरप्पांच्या बाबतीत कठोर भूमिका घ्यावी लागली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची आणि पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची कोंडी होऊ नये या एकमात्र कारणावरून आपण राजीनामा देणार आहे. शुक्रवारी सायंकाळी बेंगळूरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यागपत्र देणार आहे. संपूर्ण प्रकरणात आपली एकही चूक नाही. जर चूक असेल तर परमेश्वराने आपल्याला शिक्षा द्यावी. या प्रकरणात सर्व प्रकारच्या आरोपामधून आपण मुक्त होणार आहे.
आई चैंडेश्वरी आपले रक्षण करेल. या प्रकरणाविषयी तपास करण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी संपूर्ण तपास करण्यास संमती दर्शविली आहे. तपासानंतरच सत्यासत्यता बाहेर येईल. या प्रकरणात आपला बळीचा बकरा होणार नाही असा विश्वास आपल्याला आहे, असे ते म्हणाले. हिंडलग्यातील काही विकासकामाची बिले देण्यासाठी ईश्वरप्पा यांनी 40 टक्के कमिशन मागितल्याची तक्रार कंत्राटदार संतोष पाटील यांनी पंतप्रधानांकडे केली होती. त्यानंतरही दबाव वाढल्याने त्यांनी मंगळवारी उडुपीतील शांभवी लॉजमध्ये आत्महत्या केली होती. आपल्या मृत्यूला ईश्वरप्पाच जबाबदार आहेत, असे त्यांनी व्हॉट्सअप संदेशामध्ये म्हटले होते. या प्रकरणात ईश्वरप्पांविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. दरम्यान मागील दोन दिवसांपासून ईश्वरप्पा राजीनामा देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यांचा राजीनामा न घेतल्यास भाजपची राष्ट्रीय पातळीवर कोंडी होऊ शकते. त्यामुळे भाजप हायकमांडने ईश्वरप्पांचा राजीनामा घेण्याची सूचना मुख्यमंत्री बोम्माई यांना दिली आहे.
ईश्वरप्पांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच
आपल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. उशिरा का होईना ईश्वरप्पांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. परंतु, त्यांना अटक होईपर्यंत काँग्रेसचे आंदोलन थांबणार नाही. प्रथम भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ईश्वरप्पांना अटक व्हावी. ईश्वरप्पांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षाचा विजय नाही. हा कर्नाटकातील जनतेचा विजय आहे. न्यायासाठी आपण आंदोलन केले आहे. प्रसिद्धीमाध्यमांचे आंदोलन देखील महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे आपण प्रसिद्धीमाध्यमांना धन्यवाद देत आहे.
– डी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष