भारताचा अवकाश कार्यक्रम यंदा साठ वर्षं पूर्ण करत असून त्याला साऱया जगानं दखल घेण्याइतपत कमालीचं यशस्वी बनविलंय ते ‘इस्रो’नं…विक्रम साराभाई, सतीश धवन, यु. आर. राव, एम. जी. के. मेनन, माधवन नायर, एम. अण्णादुराईसारख्या दिग्गज शास्त्रज्ञांच्या मिळालेल्या नेतृत्वाचा हा परिपाक…‘इस्रो’च्या रॉकेटवर स्वार होऊन भारत प्रगतीच्या नवनवीन कक्षा ओलांडतानाच व्यावसायिक उपग्रह बाजारपेठेचा अधिकाधिक हिस्साही काबिज करण्याची स्वप्नं आता पाहू लागलाय…
रविवार 23 ऑक्टोबर…भारतीय नागरिक दिवाळीची स्वप्नं पाहण्यात रंगले होते…मध्यरात्रीची 12 वाजून 7 मिनिटं…‘इस्रो’नं 641 टन वजनाचा आपला सर्वांत वजनदार प्रक्षेपक ‘एलव्हीएम थ्री-एम टू’चं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केलं. त्यानं ‘वन वेब’ या जगभरात दूरसंचार जाळं असलेल्या ब्रिटिश कंपनीचे 36 दूरसंचार उपग्रह ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये सोडले (‘लो अर्थ ऑर्बिट’ म्हणजे 1600 ते 2000 किलोमीटर उंचीवरील कक्षा, तर ‘मध्यमस्तरीय कक्षा’ ही 2000 ते 35786 किलोमीटर्सपर्यंत. त्यावरील कक्षेला ‘उच्चस्तरीय’ म्हणतात)…‘इस्रो’ची व्यावसायिक शाखा ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’नं 2019 मध्ये स्थापना झाल्यानंतर पहिलावहिला करार केला होता तो ‘वन वेब’शीच. विशेष म्हणजे ‘एअरटेल’चे सर्वेसर्वा सुनील भारती मित्तल यांच्या ‘भारती एंटरप्राइझेस’ची तिच्यात फार मोठी गुंतवणूक आहे. ‘वन वेब’ 648 उपग्रह ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये सोडणार असून त्यातील 108 उपग्रहांना दिशा दाखविणार ती नवी दिल्ली…
‘पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल’ हा आपला सर्वांत यशस्वी उपग्रह प्रक्षेपक असला, तरी त्याच्यात वजनदार उपग्रह सोडण्याची क्षमता नसल्यानं निर्मिती करण्यात आलीय ती ‘जीएसएलव्ही’ची (जिओसिक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल). चाचण्यांची सुरुवात फारशी उत्साहवर्धक नव्हती, पण भारतीय शास्त्रज्ञांनी अतिशय प्रयत्नपूर्वक ‘जीएसएलव्ही मार्क-थ्री’ प्रक्षेपकाची निर्मिती करण्यात यश मिळविलं अन् त्याचंच नामकरण आता ‘एलव्हीएम थ्री-एम2’ असं करण्यात आलंय. त्यानं 4 टनांचा उपग्रह ‘जिओसिक्रोनस’ कक्षेत, तर 8 टन वजनाचा उपग्रह ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये सोडला…‘पीएसएलव्ही’च्या व्यतिरिक्त अन्य एखाद्या भारतीय प्रक्षेपकाचा व्यावसायिक अंतराळ बाजारपेठेतील हा पहिलाच प्रवेश. यासह, आपण बाजारपेठेतील भारी प्रक्षेपक विभागात देखील प्रवेश केलाय. ‘इस्रो’च्या कोणत्याही रॉकेटनं 5.8 टन इतका ‘पे-लोड’ अवकाशात नेण्याची सुद्धा ही पहिलीच वेळ…
त्यापूर्वी 18 ऑक्टोबर, 2021 रोजी ‘इस्रो’नं ‘चांद्रयान-2’ची चंद्राच्या कक्षेत ‘नासा’च्या ‘रिकॉनायसन्स ऑर्बिटर’शी होणारी टक्कर प्रचंड कौशल्यानं चुकविली अन् सारं जग आश्यर्चचकीत झालं…भारताच्या दृष्टीनं तो अत्यंत अभिमानाचा क्षण होता. परंतु हे यश मात्र मिळविण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी सहा दशकं प्रचंड कष्ट केलेत हे विसरणं शक्य होणार नाहीये…चर्चमधल्या लहान, डळमळीत सुरुवातीनंतर भारताचा अवकाश कार्यक्रम मार्गी लागला आणि सध्या आपल्या भात्यात आहे दळणवळण नि ‘रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट्स’ची फार मोठी फळी. देशाचे उपग्रह दूरसंपर्क, हवामानाचे अंदाज, आपत्ती व्यवस्थापन, नेव्हिगेशन, टेलिमेडिसिन, दूरस्थ शिक्षण वगैरे क्षेत्रांत यशस्वीरीत्या मुशाफिरी करताहेत…भारताच्या अवकाश कार्यक्रमानं विज्ञानाच्या क्षेत्रात, आम्ही मिळविलेल्या यशात सर्वांत वरचं स्थान पटकावलंय असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये…
विशेष म्हणजे फार कमी खर्चाच्या साहाय्यानं नवी दिल्लीनं ही झेप घेतलीय. उदाहरणार्थ ‘मार्स ऑर्बिटर मिशन’पेक्षा जास्त खर्च केले होते ते मंगळ ग्रहावर आधारित हॉलिवूडच्या एका चित्रपटानं…2019 पर्यंत देशानं अंतराळ कार्यक्रमासाठी 1.8 अब्ज डॉलर्स खर्च केले, तर अमेरिकेनं 19.5 अब्ज डॉलर्स. चीननं देखील 11 अब्ज डॉलर्स ओतलेत (‘जीडीपी’च्या केवळ 0.23 टक्के हिस्सा ‘इस्रो’वर खर्च केला जातोय). हे आकडेच आपल्या शास्त्रज्ञांची कुशलता सिद्ध करण्यास पुरेसे. यंदा भारताचा ‘स्पेस प्रोग्राम’ 60 वर्षं पूर्ण करतोय आणि आता त्यात भर पडलीय ती या क्षेत्राशी संबंधित 100 ‘स्टार्टअप्स’ची…
‘इस्रो’चे माजी अध्यक्ष के. सिवन म्हणतात, ‘अवकाश तंत्रज्ञानाचा व्यवहारात मोठय़ा प्रमाणात वापर करण्याचं सारं श्रेय द्यावं लागेल ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना. त्यांच्या कारकिर्दीतच या क्षेत्रातील मुत्सद्देगिरी अनेक पटींनी वाढली. ‘साऊथ एशिया सॅटेलाईट’च्या प्रक्षेपणानंतर आम्ही अनेक देशांना ‘रिमोट सेन्सिंग डेटा’चा पुरवठा केलाय अन् विदेशी व्यक्तींना प्रगत असं प्रशिक्षण देखील दिलंय. भारत साऱया विश्वासाठी ‘सोलर कॅलक्युलेटर’ची निर्मिती करणार असून लवकरच भूतानच्या उपग्रहाला देखील अवकाशाचं दर्शन घडविण्यात येईल. परंतु आता सर्वांचं लक्ष केंद्रीत झालंय ते ‘गगनयान’ मोहिमेवर. मला आशा आहे की, खासगी क्षेत्राची भूमिका त्यात अत्यंत महत्त्वाची राहील’!
संकलन ः राजू प्रभू