पिंपरी / प्रतिनिधी :
यंदा पाऊस समाधानकारक पडला आहे. पण, पावसाने शेतकरी वर्गाचे नुकसानही केले आहे. कोकणसह काही भागात जोराचा पाऊस झाला. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्यांना उभे करायचे, सावरायचे असते. त्यांना मदत करायची असते. राज्य सरकारने शेतक-यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. सध्या महागाई आणि बेरोजगारी यावरील लोकांचे लक्ष विचलित करण्याकरिता असले काही तरी मुद्दे काढण्यात येत असल्याचे त्यांनी याकूब मेनन प्रकरणावर बोलताना सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळांना अजित पवार यांनी (गुरुवारी) भेटी दिल्या. त्यावेळी काळेवाडी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे – पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते.
अधिक वाचा : कुणीही आले, तरी ‘बारामती’वर परिणाम नाही
अजित पवार म्हणाले, कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळात सार्वजनिक उत्सवात कोणाला भाग घेता आला नाही. साधेपणाने सण साजरे करावे लागले. यंदा मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. पिंपरी-चिंचवडने अनेक वर्ष मला अतोनात प्रेम दिले. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच या भागातून झाली. तेव्हापासून या सगळ्या जनतेशी माझा संबंध आहे. मी कधीही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन असले कार्यक्रम करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी बाप्पाला काहीही साकडे घातले नाही. ज्यावेळेस आपली एखाद्या ठिकाणी श्रद्धा, भक्ती, आपण तिथे नतमस्तक होणासाठी जातो. त्यावेळेस प्रत्येकाने तिथे जाऊन साकडेच घातले पाहिजे असे नाही, असेही ते म्हणाले.
दोषींना कठोर शिक्षा करा
मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचे कोविड काळात सुशोभीकरण करण्यात आल्याच्या मुद्दयावर भाष्य करताना अजितदादा म्हणाले, कुठल्याही देशद्रोही व्यक्तीचे उदात्तीकरण होता कामा नये. कोणाचेही सरकार असले तरी कुठल्याही सरकारच्या काळात या गोष्टी व्हाव्यात असे कधीच कोणाला वाटणार नाही. आता सध्या महागाई आणि बेरोजगारी यावरील लोकांचे लक्ष विचलित करण्याकरिता असले काही तरी मुद्दे काढायचे चालले आहे. आता केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. या कृत्यामागे कोण आहे, कोणी हे सगळे केले ते शोधून काढा आणि दोषींना कठोर शासन करा.