प्रतिनिधी/ मडगाव
सत्ता असो वा नसो आपल्याला काही फरक पडत नाही. मडगावातील जनतेवर आपला पूर्ण विश्वास आहे. त्यांना जाब देण्यासाठी आपण समर्थ आहे अशा शब्दात आमदार दिगंबर कामत यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रतिक्रीया व्यक्त केली.
आपण दिल्लीला गेलो किंवा मुंबई व बंगळूरला गेला तर आपल्या संदर्भात अफवा पसरविल्या जातात. आपल्याला भाजपचा उपकर्णधार म्हणतात आपण अशा गोष्टींना अजिबात किंमत देत नाही. आपल्या संदर्भात गेली दहा वर्ष अफवा पसरविल्या जातात. आपण दिल्लीला गेलो की, भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याच्या अफवा पसरविण्यात येतात. आपल्यावर त्याचा अजिबात परिणाम होत नाही.
आपले कार्यकर्ते प्रचंड दुखावले गेले
आपण विरोधी पक्ष नेता होतो. त्यानंतर अचानकरित्या आपल्याला बाजूला काढण्यात आले. त्यामुळे आपले कार्यकर्ते प्रचंड दुखावले गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तुम्ही कुठलाही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले होते असे श्री. कामत म्हणाले.
काँग्रेसचे आमदार जेवण्यासाठी आले होते
रविवारी ज्या दिवशी मडगावात राजकीय नाटय़ सुरू होते, त्या दिवशी काँग्रेसचे काही आमदार जेवणासाठी आपल्या घरी आले होते. आपले ते सहकारी असल्याने त्यांचे स्वागत करणे आपले कर्तव्य होते. आपण, त्या दिवशी पणजीला सुद्धा गेलो नव्हतो असे श्री. कामत म्हणाले.
नगराध्यक्षपदाचा निर्णयावर विजयकडे चर्चा करणार
मडगाव नगरपालिकेवर आमदार दिगंबर कामत व आमदार विजय सरदेसाई यांचे वर्चस्व आहे. नगराध्यक्षदासाठी अलिखित करार झालेला आहे. त्यानुसार विजय सरदेसाई यांच्या पॅनेलमधील नगरसेवकाला पहिल्यांदा नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. आत्ता नवीन नगराध्यक्ष निवडताना आपण व विजय सरदेसाई या विषयावर चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती श्री. कामत यांनी दिली.
यावेळी उपनगराध्यक्षा दिपाली सावळ, नगरसेवक दामोदर शिरोडकर तसेच उपस्थित होते.