कोल्हापूर: राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारी बद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल सविस्तर चर्चा झाली आहे.पुढे काय करायचे तेही ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापुरात व्यक्त केला. दरम्यान संभाजीराजे मुंबईकडे रवाना झाले आहेत.
राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून राज्यात मोठी घडामोड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवबंधन न बांधण्याचा ठाम निर्णय घेतल्यानंतर संभाजीराजे यांची कोंडी निर्माण झाली होती. राजकारणातील घडामोड पाहता छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी ते मुंबईला रवाना झाले असून सायंकाळपर्यंत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत वडील श्रीमंत शाहू महाराज यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. तर मुंबईकडे जाताना संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कुटुंबियांकडूनही अपक्ष लढण्याचा आग्रह
भाजपकडून राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे खासदारकी मिळाल्यानंतर संभाजी राजेंची भूमिका थोरले श्रीमंत शाहू महाराज यांना रुचली नव्हती. मात्र मागील सहा वर्षाच्या कालावधीत संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका पाहता, कुटुंबियांनी देखील संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेच्या निवडणुकीत यावेळी अपक्ष म्हणून लढावे. असा आग्रह केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संभाजीराजे अपक्ष लढणार की? शिवसेना पुरस्कृत उमेदवारी स्वीकारणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे.
आज सकाळी अर्धा तास कुटुंबियांशी चर्चा
संभाजीराजे छत्रपती यांनी शिवबंधन बांधून राज्यसभेची उमेदवारी घ्यावी. अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या या भूमिकेला पाठ दाखवत अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे. शिवबंधन नको! पण महाविकासआघाडी पुरस्कृत उमेदवारी द्यावी, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली होती. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोण उमेदवार असावा? अशी गोची शिवसेनेची झाली होती. मात्र मागील चोवीस तासाच्या घडामोडी पाहता काय निर्णय घ्यावा? यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आज सकाळी नवीन राजवाडा येथे येऊन कुटुंबीयांशी अर्धा तास चर्चा केली. या चर्चेत त्यांनी अपक्ष लढावे की शिवबंधन बांधून निवडणूक लढवावी याबाबत चर्चा झाली. त्याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. या बैठकीनंतर संभाजीराजे मुंबईकडे रवाना झाले.